मुंबई : राज्यात सत्ता स्थापनेचा घोडा अडून पडला आहे. शिवसेना मुख्यमंत्री पदाबाबत ठाम असल्याने आणि भाजप मुख्यमंत्री पदावरील दावा सोडत नसल्याने सत्ता स्थापनेला अडचण ठरत आहे. दरम्यान 7 नोव्हेंबरपर्यंत राज्यात सत्ता स्थापन होऊन सरकार अस्तित्वात आले नाही तर राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होईल, असे सांगत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनेला सूचक इशारा दिला. यावरून सत्ता स्थापनेसाठी भाजप शिवसेनेवर दबाव आणत असल्याची चर्चा आहे. दिवाळीमुळे चर्चेला उशीर झाला, असा दावा सुधीर मुनगंटीवार यांनी केला आहे.
पाच वर्षांपूर्वी 31ऑक्टोबर 2014 रोजी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि ते महाराष्ट्रातील भाजपचे पहिले मुख्यमंत्री झाले होते. यंदा विधानसभेत लोकांनी महायुतीच्या बाजूने कल दिला होता. निकाल लागून नऊ दिवस उलटले तरी शपथविधीचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. दोन्ही बाजूने ताणून धरलं जात आहे. परिणामी नवं सरकार स्थापन होण्यासाठी उशीर होत आहे.