नवी दिल्ली-राफेल करारप्रकरणी संसदेत चर्चा झाली तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी सभागृहत उपस्थित नव्हते. या प्रकरणावर चर्चा करताना अर्थमंत्री अरुण जेटली यांनी मोठ्या रोषात भाषण दिले. मला शिवीगाळही केली मात्र आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांनी दिली नाहीत, असे सांगत कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा हल्लाबोल केला.
राफेल डीलप्रकरणी पंतप्रधानांनाच आम्हाला प्रश्न विचारायचे आहेत. याची उत्तरे त्यांनीच देणे अपेक्षित आहेत. संसदेत जेव्हा संरक्षणमंत्री पंतप्रधानांच्यावतीने या विषयावर बोलतील तेव्हा त्यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत असे आव्हानही संरक्षण मंत्री निर्मला सितारामण यांना केले आहे.
फ्रान्सचे तत्कालिन अध्यक्ष ओलांद यांनीही अनिल अंबानींना कंत्राट देण्यास मोदींनी सांगितल्याचे म्हटले आहे. जी डसॉल्ट कंपनी या विमानांची निर्मिती करणार आहे. या कंपनीच्या अंतर्गत ई-मेलमधील संवादात भारत सरकारने त्यांना राफेल डील प्रकरणाचे ऑफसेट कंत्राट केवळ अनिल अंबानींनाच देण्याची सूचना केल्याचे राहुल गांधी यांनी सांगितले. तसेच या व्यवहारापोटी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अनिल अंबानींना ३०,००० कोटी रुपयेही देऊ केल्याचा पुनरुच्चार यावेळी राहुल गांधी यांनी केला.