चोपड्यात तापी शेतकरी सूतगिरणीचे उद्घाटन
चोपडा : शेतकरी,कामगार व युवकांचा विकास करण्यासाठी राष्ट्रवादी, कॅाग्रेस व शिवसेना हे पक्ष एकत्रीत आले आहेत. शेतकऱ्यांना त्यांच्या घामाचे मोल मिळावे अशी अपेक्षा आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्त्या देखील थांबतील. देशाचे शेती, व्यापार व उद्योगावर चिंताजनक चित्र आहे. देशाची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली आहे. मात्र अर्थव्यवस्था सुधारण्याच्या दृष्टीने मोदी सरकारची धोरणे पुरेशी नाहीत. ग्रामीण भागात वीज, पाणी, दळणवळण व्यवस्थेचा अभाव असल्यामुळे आर्थिक विकास रखडला असल्याचे आरोप माजी केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार यांनी येथे केले. वेले ता.चोपडा शिवारातील तापी शेतकरी सहकारी सुतगिरणीच्या उद्घाटन प्रसंगी खासदार पवार बोलत होते.कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी कामगार मंत्री ना.दिलीप वळसे पाटील होते.
चोसाका भाडेतत्वावर देणे मला पटणारे
यावेळी खा.शरद पवार म्हणाले की,आर्थिक अडचणींमुळे व ऊसाच्या कमतरतेमुळे चोपडा शेतकरी साखर कारखाना बंद पडला आहे.त्याला सुरू करण्यासाठी कारखाना भाडेतत्वावर देण्याची मागणी सगळ्यांनी माझ्याकडे केली.परंतु भाडे तत्व हे मला न पटणारे आहे.त्यापेक्षा कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने सगळ्यांनी एकत्र बसून यथायोग्य निर्णय घेण्याचे आवाहन केले.कारखाना भाडेतत्वावर देणे म्हणजे शेतकरी व सभासदांना आपल्या हितावह नसल्याचे त्यांनी सांगितले.