नेरुळ । कर्जत राजनालयाच्या दुरुस्तीसाठी सत्तर कोटींपेक्षा अधिक निधी खर्च करूनही निकृष्ट दर्जाच्या कामामुळे या नाल्याची दुरुस्तीनंतर अवघ्या तीन वर्षात मोठ्या प्रमाणात पडझड झाली आहे. त्यामुळे दुबार भात शेतीसाठी डिसेंबर महिन्यात पाणी सोडल्यास हे पाणी शेवटच्या शेती पर्यंत पोहोचू शकणार नाही. या कारणामुळे प्रथम राजनाल्याची डागडुजी करा मगच पाणी सोडा अशी जोरदार मागणी गौरकामथ आणि वदप आदी शेतकर्यांनी पाटबंधारे अभियंत्यांनी आयोजित केलेल्या बैठकीत केली.
कर्जत तालुक्यातील गौरकामथ येथे गुरुवारी सकाळी 11 वाजता राजनाल्या संदर्भात पाटबंधारे विभागाचे सहाय्यक अभियंता श्रेणी दोनचे अमित पारधी, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श. रु. माने, मोजणीदार राम व्ही. वाघ, लि. ट. हनुमान कालेकर, मजूर सुरेश सोनावळे यांनी शेतकर्यांच्या बैठकीचे आयोजन विठ्ठल रखुमाई मंदिरात केले होते.
गेल्या वर्षीही आश्वासन ग्रामस्थांना देण्यात आले होते आणि आताही तेच आश्वासन देतात. आता आम्हाला आश्वासन नको ठोस काम पाहिजे.अशी मागणी शेतकर्यांनी केली. तसेच वदप येथील तेरा- बी पोटनाल्यालगत पाईप फुटल्याने नाल्याचे पाणी शेजारील तलावात जाते त्यामुळे तलावाची पातळी वाढून तलावाचा बांध फुटण्याची शक्यता आहे. तलावाजवळ वस्ती असल्यामुळे तलावाचा बांध फुटल्यास संपूर्ण पाणी त्या वस्तीत शिरले जाईल मोठ्या प्रमाणात नुकसानीला सामोरे जावे लागेन. या तलावामुळे वस्तीमध्ये भीतीचे सावट पसरले आहे.
डागडुजीचे आश्वासन
ग्रामस्थांनी प्रश्नाचा घडीमार करत अधिकार्यांची बोलती बंद केली. या बैठकी मध्ये शेतकर्यांनी नाल्याची दुरवस्था झाल्याचे अधिकार्यांना सांगितले. मागील वर्षीही याबाबत निवेदन दिले तेव्हा राजनाल्याची डागडुजी करून स्वच्छता करण्यात येईल असे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्येक्षात नाल्याचे काम न केल्याने नाल्यात जंगली झाड्याझुडपे वाढली आहे. नाल्याच्या कडेची माती नाल्यात ढासळल्याने नाल्यात गाळ साचला असूनही अद्याप काहीच काम केले नाही. या बैठकीस बळीराम खंडागळे, खंडू शिंदे, जगदीश पाटील, कृष्णा चव्हाण, राजेश पाटील, पंकज पाटील आदी शेतकरी उपस्थित होते.
वदप तळ्या लगत असलेला राजनालयाचा आऊट लेट पाईप फुटल्याने तलावात पाणी शिरून तलाव ओव्हर फ्लो होत आहे. तसेच आजूबाजूच्या परिसरात,घरात पाणी शिरून नुकसान होण्याची शक्यता आहे.
-जगदीश पाटील, शेतकरी,वदप