अहमदनगरमध्ये बनावट दारुचे बळी अकरावर

0

अहमदनगर । अहमदनगरला बनावट दारुकांडातील मृत्यूचे तांडव काही थांबताना दिसत नाही.नगरमधील जेऊर गटातील पांगरमल गावात पंचायत समिती निवडणुकांमध्ये बनावट दारू पिल्यामुळे आतापर्यंत 11 नागरिकांचा बळी गेला आहे. पांगरमलच्या भास्कर अव्हाड यांचा खासगी रुग्णालयात मंगळवारी उपचारा दरम्यान मृत्यू झाला. अजूनही 10 जणांवर वेगवेगळ्या रुग्णालयात उपचार सुरु असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे.तर कौडगावला नरेन्द्र चकले यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झालाय. गेल्या तीन दिवसापासून चकले अत्यावस्थ होते.

कौडगावला तीनच दिवसांपुर्वी बनावट दारुने बाळासाहेब मदगे यांचा मृत्यू झालाय. त्यामुळे गावात शोकाकुल वातावरण आहे. तर जिल्ह्यात वेगवेगळ्या ठिकाणी अजूनही तीन ते चार जणांचा बनावट दारुने मृत्यू झाल्याची चर्चा आहे मात्र पोलीस दप्तरी त्याची नोंद नाही.

काय आहे प्रकरण?
निवडणूक प्रचाराच्या पार्टीदरम्यान अतिमद्यसेेवनाने आठ जणांचा मृत्यू झाला आहे. बनावट दारू प्यायल्याने त्यांचा मृत्यू झालाचा आरोप आहे. या प्रकरणाचे चौकशी केली असता अहमदनगरच्या जिल्हा रूग्णालयापर्यंत येवून पोहचले. जिल्हा रूग्णालयाच्या कॅन्टीनच्या आवारात बनावट दारूची विक्री सुरू असल्याचे उघड झाले. 12 प्रकारच्या विदेशी दारुच्या बाटल्यांची झाकणे, रिबॉटलिंग साहित्य, इसेन्स कलर असे अनेक साहित्य कॅन्टीनमधून जप्त करण्यात आले. शिवाय या कॅन्टीनमधून अनेक आधार कार्ड आणि द्रारिद्र्य रेषेखालील रेशन कार्डचा साठाही उत्पादन शुल्क विभागाने जप्त केला आहे. त्यामुळे यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई केल्यानंतर ही गंभीर बाब समोर आली आहे. रुग्णालयाच्या बाजूला असलेल्या झोपडपट्टीत तसेच शहराच्या इतर परिसरात ही दारु सर्रास विकली जाते.