पुणे । मार्केट यार्डातील फळ विभागात गेल्या आठवड्याच्या तुलनेत रत्नागिरी हापुसची आवक दुप्पट झाली आहे. तर कर्नाटकातून होणारी आंब्याची आवक ही वाढली आहे. अतिरिक्त आवक ठेवण्यासाठी उभारण्यात आलेले शेड वापरण्यास व्यापार्यांनी सुरूवात केली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील वाहतुक कोंडी कमी झाली आहे.
शेडमध्ये अतिरिक्त झालेली आवक ठेवता येणार
बाजारात दरवर्षी आंब्याची मोठी आवक होत असते. त्यामुळे सहाजिकच येथे मोठ्या प्रमाणात वाहतूककोंडी होत असते. त्याचा फटका किरकोळ विक्रेते असलेले खरेदीदार, सर्वसामान्य नागरिकांना होत असते. या पार्श्वभूमीवर वाहतूककोंडी टाळण्यासाठी बाजार समिती यावर्षी जनावर बाजाराच्या बाजूला 20 हजार स्क्वेअर फुट शेड उभारले आहे. ये शेडमध्ये व्यापार्यांना अतिरिक्त झालेली आवक ठेवता येणार आहे. व्यापार्याला सुरूवातीला त्याच्या गळ्यावर, त्यानंतर गाळ्यापासून 15 फुट जागेत माल ठेवता येणार आहे. हे भरल्यानंतर अतिरिक्त आलेला माल शेडमध्ये ठेवता येणार आहे.
व्यापार वाढण्यास मदत होणार
विशेषत: कर्नाटक हापूसची मोठी आवक होत असते. कर्नाटक आंब्याचा व्यापार करणार्यांना याचा जास्त लाभ होणार आहे. या शेडमध्ये आंबा ठेवण्यास व्यापार्यांनी सुरूवात केली आहे. याविषयी आंब्याचे व्यापारी अरविंद मोरे म्हणाले, नवीन शेडमुळे येथील वाहतुक कोंडीचा प्रश्न सुटेल. येथील वाहतुक कोंडीमुळे शेतकरी मुंबईला माल पाठविण्यास पसंती देत. मात्र, बाजार समितीने जागा उपलब्ध करून दिल्याने त्याचा फायदा होईल. व्यापार वाढेल. पुण्यातील आवक वाढेल. भरून आलेल्या ट्रक लवकर मोकळ्या होतील. शेतकर्यांना भावही जास्त मिळेल.