धुळे । तालुक्यातील 35 गावाच्या ग्रामपंचायत निवडणुका जाहीर झाल्या आहेत. या सर्व जागा जिंकण्याचा निर्धार तालुक्यातील चार गटांच्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात करण्यात आला. त्यातून आगामी ग्रामपंचायत निवडणुकीसाठी भाजप सर्व प्रथम मैदानात उतरली असून शंखनाद केला आहे. कार्यकर्त्यांनी कंबर कसून कामाला लागावे असे आवाहन भाजपचे मनोहर भदाणे यांनी केले. आगामी ग्रामपंचायत व पुढील वर्षी होणार्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीनिमित्त येथील सोमेश्वर मंदिर प्रांगणात सोनगीर, नगाव, लामकानी, कापडणे गटातील भाजप तसेच माजी आमदार (कै.) द.वा. पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला. अध्यक्षस्थानी भदाणे होते. यावेळी ते बोलत होते.
पदाधिकार्यांची उपस्थिती
प्रमुख पाहुणे म्हणून भाजप किसान सेलचे जिल्हा अध्यक्ष रामकृष्ण खलाणे, भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष राम भदाणे, बहुजन समाज शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ए. के. कासार, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य आधार माळी, बुरझडचे माजी सरपंच जगन्नाथ जाधव, जिल्हा सरचिटणीस ज्ञानेश्वर चौधरी, किसान सेलचे तालुका अध्यक्ष सुनील पाटील, माळी समाजाचे अध्यक्ष आर. के. माळी, जि.प.सदस्य शामलाल मोरे, डॉ.अजय सोनवणे, डॉ. युवराज नवटे, रविराज माळी, शहराध्यक्ष साहेबराव बिरारी, श्याम माळी आदी उपस्थित होते.
नागरिकांच्या अडचणी सोडवा
राम भदाणे म्हणाले की, कार्यकर्त्यांनी जनतेच्या अडीअडचणी सोडविण्यास मदत करावी. गावां गावात अनेक कार्यकर्ते आहेत. सर्वांना जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य होता येणार नसल्याने कुठेही बंडखोरी न करता योग्य उमेदवाराच्या पाठीशी सगळी शक्ती उभी करा. इतरांना सरपंच, विविध कार्यकारी संस्था, ग्रामपंचायत सदस्य आदी जागांवर सामावून घेतले जाई असे आश्वासन दिले. भाजपशासनाने लोकनियुक्त सरपंच निवड जाहीर केल्याने प्रत्येक वॉर्डात सरपंचला कामे करणे भाग पडेल. प्रास्ताविक व सुत्रसंचलन संतोष पाटील यांनी केले.
विरोधक भूलथापा देतात
केंद्रात व राज्यात भाजप सरकार मात्र स्थानिक आमदार विरोधी पक्षाचा असल्याने ते काहीच काम करु शकत नाही. फक्त भूलथापा देण्याचे काम करतात. त्यामुळे मतदारसंघाचा पाणी, आरोग्य व सिंचन योजनेचा विकास झाला नाही. त्यांचा राजकीय अभ्यास नाही. केवळ पैशांच्या जोरावर निवडून आले. चुकीच्या हाती सत्ता दिल्याने सोनगीरकरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. यासाठी प्रत्येक ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समिती भाजपाच्या ताब्यात घ्यावे असे आवाहन भदाणे यांनी केले.