भुसावळ : संभाजी ब्रिगेडने आतापर्यंत 100 टक्के समाजकार्य करीत शेतकरी व सर्व घटकांना न्याय मिळवून देण्याचे कार्य केले मात्र याचा फायदा काही राजकीय पक्षांनी घेतला. त्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक लढवून 100 टक्के राजकारण करणार असल्याचे जिल्हाध्यक्ष अनिल पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहिर केले. राजकारणात पदार्पणानंतर सर्वप्रथम महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलच्या निवडणुकीत चार जागांवर उमेदवार देवून निवडणूक लढविणार असल्याचेही पाटील यांनी
यावेळी सांगितले.
निवडणुकीसाठी पैसा व दारुला टाळणार
याप्रसंगी बोलतांना पाटील म्हणाले की, प्रचार, प्रसार, आर्थिक, धार्मिक, शिक्षण व राजसत्ता ताब्यात घेवून बहुजनांच्या हितासाठी काम करणे हे एकमेव ब्रीद समोर ठेवून 100 टक्के राजकारण व 100 टक्के समाजकारण करण्याचा निर्णय वरिष्ठ पातळीवर घेण्यात आला. तसेच यामध्ये पुरोगामी पक्षांचा पाठिंबा घेवून ज्या ठिकाणी संघटन कमकुवत आहे तेथे तर ज्या ठिकाणी संघटन मजबूत आहे तेथे स्वबळावर निवडणुका लढविल्या जातील. शेतमालाला हमीभाव, दारुमुक्त गाव, अंधश्रध्दा निर्मूलन या मुद्यांना प्राधान्य देणार असल्याचे प्रमोद पाटील यांनी सांगितले. तसेच गैरमार्गातून पैसा उभा न करता लोकवर्गणी करुन निवडणुका लढविल्या जातील. निवडणुकीत पैसा व दारु वाटून प्रलोभने देणार नसल्याची शपथ घेण्यात आली असल्याचेही प्रमोद पाटील यांनी सांगितले.