बेळगाव । सौंदत्ती तालुक्यातील हंचिनाळ गावातील भीषण आगीत 50 हून अधिक घरे, 100 हून अधिक गवताच्यागंज्या बेचिराख झाल्या व 15 हून अधिक जनावरांचा होरपळून मृत्यू झाला. अनेक दुचाकी वाहनेही आगीत भस्मसात झाली.
सोसाट्याच्या वार्यामुळे शिवारात पालापाचोळा जाळण्यासाठी लावलेली आग पसरली. बघताबघता गावातील घरांनी आणि गवताने पेट घेतला आणि पन्नासहून अधिक संसार रस्त्यावर आले. आगीचे रौद्ररूप पाहून लोकांनी भरली घरे आगीच्या भक्ष्यस्थानी सोडून जीव वाचवण्यासाठी घराबाहेर पळ काढला. आयुष्यभर राबून कमावलेले सारे आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना लोकांना उघड्या डोळ्यांनी पाहावे लागले. सहा तासांहून अधिक काळ आग धुमसत होती.