आचारसंहितेचा भंग होत असल्याच्या मुख्य बाबींकडे राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वेधले लक्ष…
मुंबई – भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीमध्ये आचारसंहितेचा भंग होत असल्याची रितसर तक्रार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे केली आहे.मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार करताना जयंत पाटील यांनी काही घटनांवर लक्ष केंद्रीत करत काही बाबी आयोगाच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत. त्यामध्ये हिवाळी अधिवेशनच्या कालावधीमध्ये विरोधकांनी मागणी केल्यानंतर राज्याच्या कृषीमंत्र्यांनी धानावर पडलेल्या तुडतुडया रोगावर नुकसान भरपाई देण्याची कबुली दिली होती. परंतु मधल्या ६ महिन्याच्या कालावधीमध्ये अंमलबजावणी करण्यात आली नाही आणि आता भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीची आचारसंहिता लागू असताना गोंदिया जिल्हाधिकाऱ्यांनी २५ मे २०१८ रोजी सहकारी संस्थांच्या उपनिबंधकांना २६,२७,२८ मे या कालावधीपासून ते १५ जुनपर्यंत शेतकऱ्यांना नुकसानीची भरपाई वाटप करण्यासाठी पूर्णवेळ बॅंका सुरु ठेवण्याचे आदेश दिले आहेत.
शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याचा निर्णय हा डिसेंबर २०१७ रोजीचा असताना त्याची अंमलबजावणी आचारसंहितेच्या काळात केली जात आहे. पोटनिवडणूकीत मतदारांना प्रभावित करण्याचा हा अश्लाघ्य प्रयत्न झाल्याचे निदर्शनास आले आहे.अनेक ईव्हीएम मशिन्स या टेस्टिंगच्यावेळी दोषमुक्त आढळल्या असून या सर्व मशिन्स सुरत, गुजरात येथून मागविण्यात आल्या आहेत. तरी पोटनिवडणूकीत सुरत,गुजरात येथून आलेल्या मशिन्स न वापरता महाराष्ट्रातील उपलब्ध असलेल्या ईव्हीएम मशिन्सचा वापर करावा.
या निवडणूकीमध्ये व्हीव्हीएमपीएटी मशिनच्या वापर करण्यात येणार आहे. अनेक व्हीव्हीएमपीएटी मशिन अत्यंत धीम्या गतीने चालणाऱ्या आहेत. मतदारांकरिता प्रत्येक मतदान केलेली पावती महत्वाची आहे. तरी निकाल जाहीर करण्यापूर्वी व्हीव्हीपीएटी मशिनच्या पावत्यांचीही मोजणी करण्यात यावी.
तरी वरील मुद्दयांचा निवडणूक आयोगाने गांर्भियाने विचार करुन त्यावर त्वरीत निर्णय घ्यावा आणि तात्काळ कार्यवाही करावी अशी मागणीही प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी तक्रारीत केली आहे.