आजचा बंद राज्यसरकार पुरस्कृत : मनसे

0

मुंबई: नागरिकत्व दुरुस्ती कायदा (सीएए), राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी (एनआरसी) आणि ईव्हीएमला विरोध करण्यासाठी आज भारत बंदची हाक दिली आहे. या बंदवरून मनसेनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर आरोप केला आहे. बंद हा सरकार पुरस्कृत असल्याचा गंभीर आरोप मनसेनं केला आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी बंद पाळण्यात येत आहे. सांगली, धुळे या ठिकाणी या बंदला हिंसक वळण लागले आहे. तर मुंबईत कांजुरमार्ग स्थानकात रेलरोको करण्यात आला होता. काही ठिकाणी या बंदला प्रतिसाद मिळत आहे.

या बंदवरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मनसेनं राज्यातील महाविकास आघाडी सरकारवर गंभीर आरोप केला आहे. राज्यातील बंद हे सरकार पुरस्कृत आहे. राज्य सरकारच बंद पुकारत आहे, अशी प्रतिक्रिया मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनी दिली. कुठल्याही गोष्टीचा अतिरेक हा वाईटच असतो. भारत बंदबाबत नेमकं तेच घडत आहे, असंही ते म्हणाले.

नागरिकत्व कायदा आणि एनआरसी या दोन वेगवेगळ्या गोष्टी आहेत. नागरिकत्व सुधारणा कायद्याला आम्ही विरोध केला आहे. तर एनआरसीबाबत आमची भूमिका वेगळी आहे. जे घुसखोर आहेत, त्यांना त्यांच्या देशात परत पाठवण्याची यात तरतूद आहे. आमची सुद्धा भूमिका तीच आहे, असं मनसे नेते देशपांडे म्हणाले. दरम्यान, ९ फेब्रुवारीच्या मोर्चाच्या नियोजनाबाबत त्यांनी अधिक माहिती देणे टाळले. नियोजनाची प्रक्रिया सुरू आहे, असं त्यांनी सांगितलं.