आजपासून जळगावात काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा

0

फैजपूरमधून होणार सुरूवात, खान्देशात जनतेशी साधणार संवाद

मुंबई- राज्यातील भारतीय जनता पार्टी-शिवसेना सरकार उखडून टाकण्यासाठी काँग्रेसने काढलेल्या जनसंघर्ष यात्रेचा दुसऱ्या टप्प्याला आजपासून जळगाव जिल्ह्यातल्या फैजपूर येथून सुरू होणार आहे. अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी खा. मल्लिकार्जुन खर्गे, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यासह राज्यातील सर्व प्रमुख नेते, पदाधिकारी व लोकप्रतिनिधी या संघर्षयात्रेत सहभागी होणार आहेत.

यासंदर्भात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण म्हणाले की, भाजपा सरकारने जनतेला दिलेले एकही आश्वासन पूर्ण केले नाही. उलट वारंवार खोटे बोलून जनतेची फसवणूक व विश्वासघात केला आहे. शेतकरी, कष्टकरी,दलित, अल्पसंख्यांक, महिला, विद्यार्थी, तरूण असे सर्वच घटक सरकारवर नाराज आहेत. मराठा, मुस्लीम, धनगर समाज आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत आहेत. संपूर्ण महाराष्ट्र सरकारविरोधात रस्त्यावर उतरल्याचे चित्र आहे. राज्यातील जनतेच्या हक्कासाठी व महाराष्ट्राच्या हितासाठी काँग्रेसने राज्यव्यापी जनसंघर्ष यात्रा सुरू केली आहे.

१९३६ मध्ये अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे राष्ट्रीय अधिवेशन जळगाव जिल्ह्यातील फैजपूर येथे झाले होते. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यासह काँग्रेसचे त्या काळातील सर्वच ज्येष्ठ नेते या अधिवेशनास उपस्थित राहिले होते. त्याच पावन धर्तीवरून जनसंघर्ष यात्रेच्या दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ होणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही यात्रा उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, अहमदनगर या जिल्ह्यातील जनतेशी संवाद साधत पुढे जाईल व ९ ऑक्टोबर रोजी अहमदनगर येथे विशाल जाहीर सभेने या यात्रेचा समारोप होणार आहे, असेही त्यांनी सांगितले.