मुंबई : आर्थिक वर्ष 2016-17 चा कालचा (शुक्रवारचा) शेवटचा दिवस होता. त्यामुळे आज म्हणजे 1 एप्रिलपासून 2017-18 या आर्थिक वर्षाला सुरुवात झाली आहे. यामुळे आजपासून काही नियमांत बदल होणार आहेत. या बदललेल्या नियमांमुळे भारतीयांचे जीवन बदलणार आहे.
नवीन आर्थिक वर्षापासून म्हणजेच आज, 1 एप्रिलपासून काही वस्तू महाग तर काही स्वस्त होणार आहेत. पान-मसाला, सिगारेट, चांदीच्या वस्तू, हार्डवेअर, सिल्व्हर फॉइल, चांदीचे दागिने, स्टीलचे सामान आणि स्मार्टफोन महाग होणार आहेत, तर नैसर्गिक गॅस, निकल, बायोगॅस, नायलॉन, सौरऊर्जा बॅटरी आणि पॅनल स्वस्त होणार आहे.
एक एप्रिलपासून काय-काय बदलणार?
मोटार गाड्यांवरील थर्ड पार्टी इन्शुरन्सचा हप्ता जवळपास 50 टक्क्यांनी वाढणार आहे. विमा हप्त्याचे नवे दर लागू होतील. विमा नियमन प्राधिकरणाने कार आणि टू व्हीलरसर आरोग्य विमा एजंटच्या कमिशनमध्ये बदल केला आहे. या कारणानेही तुमच्या हप्त्यात 5 टक्के वाढ होत आहे. ही वाढ थर्ट पार्टी मोटार इन्शुरन्सच्या हप्त्यातील वाढीपेक्षा वेगळी असेल. भारतीय स्टेट बँकेच्या 5 सहयोगी बँका – स्टेट बँक ऑफ पटियाला, स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ म्हैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर आणि स्टेट बँक ऑफ जयपूर या बँका स्टेट बँकेत विलीन होतील. त्यामुळे या बँकांमध्ये खातं असेलेले खातेदार आता थेट स्टेट बँकेचे खातेदार म्हणून गणले जाणार आहेत. नव्या व्यवस्थेनुसार भारतीय स्टेट बँकेच्या 23 हजार शाखा आणि 21 हजार एटीएम असतील. 1 एप्रिलपासून केवळ 2 लाखांपर्यंतच्याच रोख व्यवहारांची सुविधा मिळेल. त्यापेक्षा जास्त रोखीचे व्यवहार केल्यास, व्यवहार ज्या रकमेचा असेल, तेवढाच दंड होईल. म्हणजे जर कोणी अडीच लाख रुपये रोख भागवले, तर त्याला अडीच लाख रुपयांचाच दंड होईल.