नवी दिल्ली: भाजपाच्या दिल्लीतल्या कार्यालयात भाजपचेच पदाधिकारी जय भगवान गोयल यांनी ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ हे पुस्तक प्रकाशित केले. यावरून देशभरात वाद निर्माण झाला आहे. मोदी आणि शिवरायांची तुलना कोणत्याही परिस्थितीत होऊ शकत नाही असे म्हणत अनेक नेत्यांनी भाजपला लक्ष केले आहे. दरम्यान आता पुस्तकाचे लेखक जय भगवान गोयल यांनी त्यांची बाजू मांडत स्पष्टीकरण दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रमाणेच पंतप्रधान नरेंद्र मोदी धाडसी निर्णय घेतात. मोदींचा कारभार शिवरायांसारखा असल्याचे मला वाटते. त्यामुळेच पुस्तकाला ‘आज के शिवाजी- नरेंद्र मोदी’ नाव दिल्याचं गोयल म्हणाले. पुस्तक बाजारात आलेले आहे. मात्र पक्षाचा आदेश अंतिम असेल, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे पुस्तक मागे घेण्याचीदेखील तयारी दर्शवली.
प्रत्येक व्यक्तीला बोलण्याचे, लिहिण्याचे स्वातंत्र्य आहे. त्यानुसार मला जे वाटले ते मी लिहिले. मी पुस्तक लिहून माझ्या भावना प्रकट केल्या आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशाजांनीही ते पुस्तक वाचावे. मी त्यात काहीही वादग्रस्त लिहिलेले नाही. मी शिवाजी महाराजांचा सन्मान करतो, असे गोयल यांनी स्पष्ट केले आहे.