आठवडाभरात गाड्या न्या, अन्यथा लिलाव

0

पुणे । महापालिकेच्या हद्दीतील रस्त्याच्या कडेला बंद अवस्थेत असलेल्या बेवारस गाड्या जप्तीची मोहीम महापालिकेच्या अतिक्रण विभागाने हाती घेतली होती. या कारवाईत 691 गाड्या महापालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने उचलल्या असून, त्यामध्ये दोन चाकी गाड्या 368, तीन चाकी 66, चारचाकी 250, सहाचाकी सहा गाड्या आणि सहा चाकी पेक्षा जास्त एक गाडीचा समावेश आहे. या गाड्या सोडवण्यासाठी एक महिन्याची मुदत देण्यात आली होती. ती शनिवारी संपली. मात्र, या मुदतीमध्ये त्या सोडवून घेण्यासाठी कोणी आले नाही. त्यामुळे शेवटची 7 दिवसांची मुदत देण्यात आली आहे. त्यानंतर या गाड्यांचा लिलाव करण्यात येणार आहे.

प्रशासनापुढे मोठी समस्या
शहरात 15 वर्षांहून अधिक जुन्या झालेल्या तब्बल एक लाखाहून अधिक दुचाकी आणि चारचाकी वाहने आहेत. नियमानुसार, संबधित वाहन मालकांनी ही वाहने स्क्रॅप करणे आवश्यक आहे. मात्र, कागदपत्रे नसल्याने ही वाहने स्क्रॅप करत नाही. ती स्क्रॅप करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने हे मालक ही वाहने घराबाहेर अथवा रस्त्यावरच लावतात. अशी कित्येक बेवारस वाहने रस्त्यावरती गेली अनेक वर्षे पडून आहेत. या वाहनांवर कारवाई करणार असल्याचे महापालिका प्रशासन नेहमी सांगत असते परंतु ही उचलली वाहने कुठे टाकायची ही प्रशासनापुढे मोठी समस्या आहे आणि ती पूर्णपणे सोडवण्यास प्रशासनाला यश आले नाही. तसेच वाहने उचलताना त्यासाठी लागणारी क्रेन आदी यंत्रणा देखील महापालिकेकडे पुरेशा प्रमाणात उपलब्ध नाही.

बेबारस वाहनांमुळे वाहतुक कोंडी
बर्‍याच कालावधीपासून सार्वजनिक जागांवर आणि रस्त्यांवर बंद अवस्थेत पडून असलेली ही वाहने वाहतुकीसाठी अडथळे ठरत आहेत. त्यातच या वाहनाच्या वापर दहशतवादी कारवायांसाठी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच या वाहनांमुळे रस्त्यावर होत असलेल्या वाहतूक कोंडीमुळे ही वाहने काढण्याची मागणी वाहतूक पोलीस तसेच प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून महापालिकेकडे वारंवार करण्यात येते. याबाबत पालिकेतर्फे वारंवार ही वाहने उचलण्याची मोहीम हाती घेण्यात येते. मात्र, वाहने काही उचलली जात नाही. यावेळी देखील महापौरांनी प्रशासनाला आदेश दिले होते. त्यानंतर या कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.

लिलावातून मिळणार उत्पन्न
या कारवाईत जप्त केलेल्या गाड्या घेऊन जाण्यासाठी एक महिन्याचा कालावधी देण्यात आला आहे. दंड भरून त्या गाड्या घेऊन जाता येणार आहेत. यामध्ये दोन चाकी गाड्यांसाठी एक हजार रुपये, तीन चाकीसाठी 10 हजार रुपये, चार चाकीसाठी 15 हजार रुपये, सहा चाकीसाठी 20 हजार रुपये आणि त्यापेक्षा मोठ्या गाड्यांसाठी 25 हजार रुपये दंड भरावा लागणार आहे. यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला गेला होता. मात्र, या कालावधीमध्ये कोणी आले नाही. त्यानंतर आता गाडी मालकांना शेवटची 7 दिवसाची मुदतीची नोटीस पाठवण्यात आली आहे. यानंतर गाड्यांचा नियमानुसार लिलाव केला जाईल. ज्यामुळे महापालिकेला उत्पन्न मिळू शकणार आहे, असे जगताप यांनी सांगितले.