आता अकरावी नापासांची संख्या वाढणार!

0

पुणे : राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने अकरावी उत्तीर्णतेच्या निकषांमध्ये बदल केला आहे. एखादा विद्यार्थी तीन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला यापूर्वी 30 गुण ग्रेस (अनुग्रह) दिले जात होते. त्याला आता केवळ 15 गुण ग्रेस मिळतील. यामुळे अकरावीत नापासांचे प्रमाण वाढण्याचा अंदाज वर्तविण्यात येत आहे. अकरावीचा अभ्यासक्रम पुनर्रचित केल्याने हा बदल करण्यात आला आहे. बारावीप्रमाणे अकरावीसाठी हा नियम लागू राहील. तो केवळ तीन विषयांसाठी मर्यादित असेल. एकाच विषयात विद्यार्थी अनुत्तीर्ण असेल, तर त्याला कमाल दहाच गुण ग्रेस म्हणून दिले जातील. अकरावी आणि बारावी परीक्षेतील उत्तीर्ण होण्याच्या निकषातील तफावत यामुळे दूर होणार आहे, असे मंडळाने स्पष्ट केले.

काय आहे नवे निकष?
अकरावीत तीन विषयांत वा दोन विषयांत अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्यासाठी 30 गुण विभागून दिले जात होते. म्हणजे त्याला तीन विषयांत प्रत्येकी दहा गुण मिळत होते. आता तेवढे गुण मिळणार नाहीत. विद्यार्थी तीन वा दोन विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला बारावीप्रमाणे 15 गुण विभागून दिले जातील. निकषात बदल करण्याचा प्रस्ताव मंडळाने राज्य शासनाकडे पाठविला होता. त्यास शासनाने मान्यता दिली आहे. सर्व कनिष्ठ महाविद्यालयांनी बदललेल्या निकषाची अंमलबजावणी सन 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून करावी. त्यानुसार कार्यवाही करून त्याची प्रत राज्य शिक्षण मंडळाच्या कार्यालयाकडे पाठवावी. या निर्णयाची अंमलबजावणी होत असल्याचा अहवाल पाठविणे आवश्यक आहे, असे मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी सांगितले.

एखादा विद्यार्थी अकरावीला दोन वा तीन विषयांत अनुत्तीर्ण झाला आणि तो ग्रेस गुण दिल्याने उत्तीर्ण होत असेल, तरच त्याला ग्रेस गुणांची सवलत मिळेल. एखादा विद्यार्थी चार विषयांत अनुत्तीर्ण असेल, तर त्याला ही सवलत मिळणार नाही.
– गंगाधर म्हमाणे, अध्यक्ष, राज्य उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ