आता ‘ठाकरे’ही निवडणूक लढवणार!

0

मुंबई । ठाकरे कुटुंब आणि शिवसेना हे घट्ट समीकरण आहे. मुंबई महापालिकेवर शिवसेनेचा भगवा फडकत असला, तरी ठाकरे घराण्यातील व्यक्ती आतापर्यंत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेली नाही. मात्र ठाकर्‍यांची तिसरी पिढी कदाचित आखाड्यात स्वतः उतरु शकते. बाळासाहेब ठाकरेंचा नातू, उद्धव ठाकरेंचे ज्येष्ठ सुपुत्र आणि युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी गरज पडल्यास स्वतः निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. एका इंग्रजी दैनिकाला दिलेल्या मुलाखतीत आदित्य ठाकरेंनी यासंदर्भात सूतोवाच केले आहे. ‘मी कधीच स्वतःला निवडणुकांपासून दूर ठेवलेले नाही. जर कधी वेळ पडलीच तर मी तयार आहे’ असे आदित्य यांनी म्हटले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मैदानात उतरण्याचा त्यांचा मानस आहे. आजोबांनी आपली मते आमच्यावर लादली नाहीत

मुंबई महापालिका निवडणुकांच्या निमित्ताने आदित्य ठाकरे प्रचारसभा आणि बाईक रॅली काढत आहेत. बाळासाहेब आणि उद्धव ठाकरे निवडणुकांपासून स्वतः दूर राहिले, मात्र गरज पडली तर आदित्य विधानसभा निवडणूक लढवण्याच्या तयारीत आहेत. आमदार म्हणून बरेच काम करण्यासारखे आहे, असेही त्यांना वाटते. ‘जेव्हा आजोबांनी निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्यामागे त्यांचे काही विचार असतील. मात्र त्यांनी आपली मते आमच्यावर लादली नाहीत.’ असे आदित्य ठाकरेंनी म्हटले आहे. ‘निवडणुका लढवणे चुकीचे आहे किंवा आपण कधीच निवडणुका लढवता कामा नये, असे आदेश त्यांनी आम्हाला दिले नाहीत. त्यांच्या निर्णयाचे शिवसेना पक्षाने आणि जनतेने स्वागतच केले,’ असेही आदित्य म्हणाले.

काँग्रेसने बांधलेल्या मेट्रोचे श्रेयही भाजप घेतले
भाजप सरकार सर्व गोष्टींचे श्रेय लाटत असल्याने दुःख होत असल्याचे आदित्य म्हणतात. श्रेयवादामुळे फडणवीस सरकार हे ट्विटर सरकार होण्याइतपत खालच्या पातळीला गेले आहे. काँग्रेस सरकारने बांधलेल्या मेट्रोचे श्रेयही भाजप हिरावून घेतले आहे, त्यामुळे पक्षाची वागणूक खूप बालिश असल्याचे चित्र आहे, अशी टीकाही आदित्य ठाकरेंनी केली.