आता पुन्हा ‘मानवी ढाल’ नकोच!

0

नवी दिल्ली। काश्मीरमध्ये दगडफेक करणार्‍या व्यक्तीला लष्करी जीपसमोर बांधणार्‍या मेजर गोगोई यांचा सन्मान करण्यात आल्याची घटना ताजी असताना आता लष्कराकडून नवे आदेश देण्यात आले आहेत. सामान्य काश्मिरी नागरिकांची ‘मानवी ढाल’ बनवण्याच्या घटना पुन्हा घडू नयेत, असे आदेश लष्कराच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत. काश्मीर खोर्‍यात तैनात असलेल्या जवानांनी स्थानिकांसोबत संवाद साधून त्यांच्यासोबतचे संबंध सुधारावेत, अशा सूचना लष्कराच्या वरिष्ठ अधिकार्‍यांकडून देण्यात आल्या आहेत. टाइम्स ऑफ इंडियाने याबद्दलचे वृत्त दिले आहे. ‘मेजर गोगोई यांची कृती मला व्यक्तीश: चुकीची वाटते. मात्र, ज्यावेळी ती घटना घडली, त्यावेळी मी तिथे नव्हतो. त्यामुळे त्या ठिकाणच्या परिस्थितीबद्दल मेजर गोगोई यांच्या मनात काय चालले होते, याची कल्पना मी करू शकत नाही. . मात्र असे असले तरी अशा प्रकारची कृती पुढे केली जाऊ नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. मानवी ढाल वापरण्याची कृती करण्याऐवजी स्थानिकांशी संबंध सुधारावेत, असे आदेश देण्यात आले आहेत,’ अशी माहिती काश्मीरमध्ये सेवा बजावलेल्या एका मेजर दर्जाच्या अधिकार्‍याने नाव प्रसिद्ध राखण्याच्या अटीवर दिली आहे.

शांतता राखण्याच्या सूचना
काश्मीरमधील एखाद्या व्यक्तीला ‘मानवी ढाल’ बनवण्याऐवजी सर्वच काश्मिरींशी चांगले संबंध प्रस्थापित करावेत, असे प्रयत्न लष्कराकडून करण्यात येत आहेत. ‘स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्याशी चांगले संबंध ठेवण्यासाठी प्रयत्न करावेत,’ असा आदेश काश्मीरमध्ये सेवा बजावणार्‍या अधिकार्‍यांना देण्यात आले आहेत. बडगाममध्ये दगडफेक करणार्‍या जमावापासून बचाव करण्यासाठी मेजर गोगोई यांनी एका स्थानिकाला जीपसमोर बांधल्यानंतर लष्कराविरोधात नागरिकांमध्ये तीव्र भावना आहेत. त्यामुळेच आता स्थानिकांशी संवाद साधून त्यांच्याशी चांगले संबंध प्रस्थापित करण्याला प्राधान्य दिले जात आहे.

‘भारतीय लष्कराकडून असे कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. मेजर गोगोई यांनी दगडफेक करणार्‍यांना आवर घालण्यासाठी स्थानिकाला जीपला बांधले होते. मेजर गोगोई यांनी परिस्थितीनुसार तो निर्णय घेतला होता. मेजर गोगोई यांची कृती लष्करी जवानांच्या सवयीचा भाग होणार नाही. मेजर गोगोई यांची कृती अपवादात्मक होती,’
मनीष आनंद,
लष्कराचे जनसंपर्क अधिकारी