आता प्रवाशांना पैसे न देता मिळणार रेल्वेचे तिकीट

0

नवी दिल्ली । आयआरसीटीसीने आपल्या ग्राहकांसाठी तिकीट बुकिंगसंदर्भातला एक नवा पर्याय आणला आहे. यामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता रेल्वे तिकीट बुकिंगसाठी आयआरसीटीसीने ‘बाय नाऊ, पे लॅटर’ ही सुविधा आणली आहे. या सेवेमुळे प्रवाशांना आता तिकिटाचे पैसे नंतर पुढील 14 दिवसांमध्ये देता येतील. यामुळे तिकीट बुकिंगदरम्यान येणार्‍या लांब पेमेंट प्रोसेसमधून सुटका होणार आहे. ई-पे लॅटरच्या सहयोगाने आयआरसीटीसीने ही सुविधा आणली आहे. तिकीट बुक केल्यानंतर 14 दिवसात कधीही पेमेंट करता येईल. यासाठी आयआरसीटीसीच्या संकेतस्थळावर जाऊन पेमेंट करावे लागेल.

‘बाय नाऊ, पे लॅटर’ सुविधेचा वापर करण्यासाठी आधार कार्ड किंवा पॅनची माहिती द्यावी लागेल. त्यानंतर तुमच्या नोंदणीकृत मोबाइल क्रमांकावर ओटीपी येईल. ज्यानंतर तुम्हाला तिकीट बूक करता येईल. दरम्यान यापूर्वीच आयआरसीटीसीने तिकिटासाठी कॅश ऑन डिलीव्हरी सेवा सुरु केली आहे. तिकीट बूक केल्यानंतर तुम्ही ते घरी मागवू शकता. त्यानंतर पेमेंट कार्ड किंवा कॅशद्वारे करू शकता.

आयआरसीटीसीनुसार, ही सेवा ग्राहकांसाठी अतिशय फायद्याची ठरेल जी कोणत्याही अडचणीशिवाय तिकीट बुक करेल. पुढील सहा महिने प्रत्येक दिवशी होणार्‍या 6 लाख ट्रान्झॅक्शनमधील 5 टक्के त्यांच्या प्लॅटफॉर्मवरून व्हावेत असे कंपनीचे लक्ष्य आहे.