आदिवासी बांधव जेव्हा मास्क लावून जंगलात डिंक, महफुले, तेंदूपाने गोळा करतात…

0

जळगाव/ तळोदा – जंगलांचे रक्षणकर्ते म्हणून आदिवासी बांधवांची ओळख आहे. आजच्या परिस्थितीत अनेक सुविधा आदिवासीबांधवापर्यंत पोहचल्या असतील. मात्र तरीही आदिवसावी बांधवांचा जंगलातून महुफुलें, तेंदूपाने, कैर्‍यांचा गर काढून त्याचे काप आमचूर म्हणून तयार करणे, डिंक गोळा करणे यावर उदरनिर्वाह भागतो. त्यामुळे शासनाने कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर काढलेल्या आदेशात आदिवासी बांधवांना वन उपज गोळा करण्याची सूट दिल्याने दिलासा मिळाला आहे. त्यानुसार कोरोनाचा प्रादुर्भाव होवू नये यासाठी ना भूतो न भविष्यते याप्रमाणे कुठलीही आणि कशाचीही भिती न बाळगणारे आदिवासी आदिवासी बांधव चक्क तोंडाला मास्क लावून तसेच सोशल डिस्टन्सिंगचे पालन करत वनसंपदा गोळा करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. लोक समन्वय प्रतिष्ठान व लोक संघर्ष मोचार्र् व आदिवासी प्रकल्प विभाग यांच्या संयुक्त विद्यमानानेही आदिवासी बांधवांनी कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर काळजी कशी घ्यावी, यासाठी जनजागृती करत आहेत.

मास्कसह स्वच्छतेसाठी साबणही वाटप

आदिवासी समूहांना कोरोना विषयी जाणीव जागृती करण्यासाठी ट्रायफेड व शबरी महामंडळ यांनी देश व राज्य पातळीवर डिजिटल माध्यमातून वेबिनार आयोजित केले व आदिवासी क्षेत्रात प्रधान मंत्री वन धन केंद्रांच्या माध्यमातून ही जाणीव जागृती सुरू केली आहे. त्यानुसार लोक समन्वय प्रतिष्ठाण व लोक संघर्ष मोर्चा यांच्या वतीने खान्देशातील आदिवासी समूहात मोहाची फुले गोळा करतांना कशी काळजी घेतली पाहिजे या विषयीची माहिती दिली जात आहे. लोक संघर्ष मोर्चाच्या प्रतिभा शिंदे व यावल आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी विनिता सोनवणे हे मार्गदर्शन करत आहेत. तसेच गावात मास्क व साबण यांचे वाटप करण्यात येत आहे. आदिवासी विकास महामंडळ मार्फत ह्या गावातील स्थापित वनधन केंद्राला महुवा, डींक खरेदी करण्यासाठी पाच लाख रुपये बिन व्याजी देणार आहेत यामुळे वनधन केंद्राचे अध्यक्ष इरफान पटेल यांनी सांगितले की, हे पैसे आल्यानंतर गावातच महुवा खरेदी करून साचवून ठेवता येईल व योग्य किंमत यात मिळणार आहे. यावल तालुक्यातील निमड्या गावी नुकताच कोरोनाच्या पार्श्‍वभूमिवर जनजागृती तसेच मास्क व साबण वाटप कार्यक्रम झाला. यावेळी सरपंच जुवांसिंग बारेला, लोक संघर्ष मोर्चाचे नेते रमेश बारेला, मीना तडवी, विनिता बारेला हजर होतेे.

केंद्र व राज्य शासनाने मंजुरी दिल्याने आदिवासी क्षेत्रात गौण वन उपज गोळा करणे सुरू झाले. वनधन केंद्रांना मिळालेल्या बिनव्याजी कर्जामुळे गावात महू गोळा करण्यासाठी सोय झाली असून लॉकडाउननंतर योग्य भावात ते विकता येतील व आत्ता महू फुल गोळा करणार्‍यांना आत्ता त्याचा मोबदला ही देता येईल ही समाधानाची बाब आहे. तसेच सर्वत्र आदिवासी समूहांमध्ये कोरोनापासून बचाव कसा करावा याबाबत जाणीव जागृती केली जाणार आहे.- प्रतिभा शिंदे