आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शाश्वत शेतीकडे वळा!

0

जळगाव । शेती क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन शेतीचे शास्त्र समजून घेणे आवश्यक आहे. आधुनिकतेची कास धरुन शाश्वत शेतीकडे वळल्यास शेती क्षेत्रातही निश्चितपणे यश मिळेल. असा आशावाद जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर यांनी व्यक्त केला. हरित क्रांतीचे जनक व महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कै. वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषि विभाग, महाराष्ट्र शासन व जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती, जळगाव यांच्या संयुक्त् विद्ममाने जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू महाराज सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हाधिकारी बोलत होते.

शेतकर्‍यांचा करण्यात आला सत्कार
यावेळी जिल्ह्यातील शेतकरी विश्वासराव पाटील, प्रेमानंद महाजन, रविंद्र पाटील, नारायण चौधरी यांना राज्य शासनाचे कृषि पुरस्कार जाहिर झाल्याबद्दल त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आले. रविंद्र पाटील यांच्यावतीने त्यांची पत्नी व मुलगा यांनी सत्कार स्वीकारला. तसेच जिल्ह्यातील विविध शेतकरी गटांचा व शालांत परिक्षेत प्राविण्य मिळविलेल्या बंजारा समाजातील विद्यार्थ्यांचाही यावेळी मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देतांना कृषिरत्न पुरस्कार प्राप्त विश्वासराव पाटील म्हणाले की, माझा सत्कार हा शेतात घाम गाळणार्‍या समस्त शेतकर्‍यांचा आहे.

भरीताच्या वांग्यांची टोपली भेट
कार्यक्रमाच्या सुरुवातीस कै. वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने करण्यात आली. यावेळी कृषि दिनानिमित्त आसोदा येथील नवनिर्मिती शेतकरी गटाने जिल्हाधिकारी यांना भरीताचे वांग्यांची टोपली भेट दिली.

यांची होती उपस्थिती
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषेदच्या अध्यक्षा श्रीमती उज्वलाताई पाटील या होत्या. यावेळी व्यासपीठावर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जळगाव पंचायत समितीच्या सभापती श्रीमती यमुनाबाई रोटे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी विवेक सोनवणे, कृषि विभागाचे उपसंचालक अनिल भोकरे आदि उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले की, जळगाव जिल्ह्याला शेती क्षेत्राचा मोठा वारसा आहे. केळी, भरीताचे वांगे यांचे मार्केटींग होणे आवश्यक आहे.