मुंबई : आगामी निवडणुका ‘आम्ही स्वबळावरच लढू, या निर्णयात कोणताही बदल होणार नाही,’ असे स्पष्ट करतानाच शिवसेनेच्या ताकदीने अनेकांना धडकी भरली आहे, असा टोला शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी भाजपला लगावला आहे. त्यामुळे शहा-ठाकरे यांच्या भेटीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. बुधवारी होणार्या अमित शहा आणि उद्धव ठाकरे यांच्या भेटीवर भाष्य करताना संजय राऊत यांनी ही प्रतिक्रिया दिली. ‘पालघर पोटनिवडणुकीत आम्ही आमची ताकद दाखवली. जिथे निवडणूक कधी लढवली नव्हती, तिथे लाख लाख मते मिळाली. आमची मते पाहून अनेकांना धडकी भरली आहे. चार वर्षानंतर अमित शहा यांना ‘मातोश्री’वर का यावेसे वाटते आहे? याचा विचार करा,’ असाही टोला राऊत यांनी लगावला.
भाजप अध्यक्ष अमित शहा उद्या शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. त्यामुळे युतीच्या चर्चेला पुन्हा उधाण आले असले तरी शिवसेनेने मात्र स्वबळावरच लढणार असल्याचे संजय राऊत यांनी स्पष्ट केले आहे.
‘एनडीए’मधील मित्रपक्ष एकापाठोपाठ सोडून जात आहेत. देशातील राजकारणही बदलत आहे. भाजपविरोधातील रोष वाढत आहे. त्यामुळे सगळ्यांना भेटून आगामी रणनिती आखावी, असे भाजपला वाटत असेल, त्यामुळे ही भेट होत असावी,’ असा चिमटाही त्यांनी काढला. ‘उद्धव ठाकरे यांनी स्वबळावर निवडणुका लढवण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतला आहे. जनमानसाचा कानोसा घेऊनच आम्ही हा निर्णय घेतला असून त्यात बदल होणार नाही,’ असेही सांगतानाच ’पालघरमध्येही आम्ही स्वबळावर लढवून आमची ताकद दाखवून दिलीच ना?,’ असे राऊत म्हणाले.