मुंबई। आम्ही कुणाच्याही मिंद्यात नाही. जिथे-जिथे चूक असेल, तिथे सरकारविरोधी भूमिका घेऊन स्वाभिमान दाखवू. शिवाय आमचे चुकलेले लेकरू परत आणू, आमच्या मिशीला कुणाचे खरकटे लागलेले नाही, असे म्हणत स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सदाभाऊ खोत यांच्या दुराव्याबाबत भाष्य केले. राजू शेट्टी यांनी शेतकर्यांच्या समस्या, तूर, कर्जमाफी, स्वाभिमानीतील अंतर्गत धुसफूस आणि आत्मक्लेश आंदोलन या सर्वांवर आपली रोखठोक मते मुंबईत मांडली.
वार्यावर न सोडण्याचा शब्द सदाभाऊंना दिला होता
आम्ही सन 2004 मध्ये शेतकरी संघटनेची स्थापना केली. सदाभाऊ खोत हे सन 2009 मध्ये आमच्यात सामील झाले. सदाभाऊ जेव्हा भेटले तेव्हा परिस्थितीने हताश झाले होते. मी रस्त्यावर आलोय, पुन्हा चळवळीत आलो तर वरच येणार नाही, असे म्हणत होते. पण मी त्यांना शब्द दिला, जोपर्यंत तुम्ही माझ्यासोबत असाल, तोपर्यंत तुम्हाला वार्यावर सोडणार नाही. त्यावेळी मी आमदार होतो. जर काही झालेच असते, निवडणूक हरलो असतो, तर मला मिळणार्या माजी आमदाराच्या पेन्शनमधून अर्धे सदाभाऊंना देऊ, असे सांगितले होते. मात्र, ती वेळ आली नाही, असे राजू शेट्टी यांनी सांगितले. माझ्यातला आणि सदाभाऊंमधला वाद वैचारिक आहे. शेतकर्यांच्या मुद्द्यांवरून सरकारशी संघर्ष करताना सत्तेत राहायचे की नाही यावरून मतभेद आहेत. पण आमचे टोकाचे मतभेद नाहीत, असे राजू शेट्टी म्हणाले.
एनडीएत राहायचे की नाही याचा पुनर्विचार करू
सरकारमध्ये असूनही आजही आमच्यावर सर्वाधिक गुन्हे आहेत. शेतकर्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरतोय. आम्ही एनडीएत राहायचे नाही, याचा पुनर्विचार करू, अजून दोन वर्षे आमच्या हातात आहेत. मोदींनी अपेक्षाभंग केला आहे, दिलेली आश्वासने पूर्ण केली नाहीत, असेही राजू शेट्टी म्हणाले. भारतीय जनता पक्षाला मिळालेले यश फसवे आहे, हे यश मृगजळासारखे, लोकांना पर्याय नसल्याने भाजपला बहुमत मिळाले, असे राजू शेट्टी यांनी नमूद केले.
मोदी सरकारकडून भ्रमनिरास
सदाभाऊंनी चळवळीत दिवस काढले. त्यामुळेच मी माझ्यासाठी काहीही न मागता, माझ्या माणसासाठी मंत्रिपद मागितले. भाजपने 3 विधानपरिषदेच्या जागा देतो असे सांगितले होते. मात्र, एकच मिळाली. आता उरलेल्या जागा काही मिळणार नाहीत याची खात्री आहे, असेही राजू शेट्टी म्हणाले. ज्यावेळी लोकांना आश्वासक चेहरा मिळतो, तेव्हा लोक परिवर्तनासाठी तयार होतात. मोदींच्या आश्वासक चेहर्याला लोकांनी पसंती दिली. मात्र, मोदी सरकारकडूनही भ्रमनिरास झाला. सरकारने आमचा अपेक्षाभंग केल्याची खदखद मनात आहेच, असं राजू शेट्टी म्हणाले. येत्या 22 तारखेपासून आमचे आत्मक्लेश आंदोलन सुरू होणार आहे. वाढलेल्या शेतकरी आत्महत्या हे या आत्मक्लेश आंदोलनाचे मुख्य ध्येय असून, शेतकरी कर्जमुक्ती करावी, शेतमालाला हमीभाव द्यावा, या आमच्या मागण्या आहेत, असे राजू शेट्टी म्हणाले.