मुंबई:- देशासह राज्यात रोज कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आयआयटी मुंबईने डिसेंबर २०२० पर्यंत लेक्चर न घेण्याचा निर्णय घेतला आहे.
वर्षअखेरपर्यंत सर्व प्रत्यक्ष लेक्चर स्थगित करण्याचा निर्णय घेणारी आयआयटी मुंबई देशातील पहिली प्रमुख शैक्षणिक संस्था ठरली आहे.
बुधवारी रात्री उशीरा याबाबत घोषणा करण्यात आली. “कोरोना महामारीने आमच्या विद्यार्थ्यांना शिक्षण कसं द्यावे याचा पुनर्विचार करण्यास भाग पाडलं आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाची सुरूवात उशीरा होऊ नये यासाठी आम्ही व्यापक स्वरुपात ऑनलाइन क्लास घेण्याची योजना आखत आहोत”, अशी माहिती आयआयटी मुंबई चे पदाधिकारी यांनी फेसबुक पोस्टद्वारे दिली.
या निर्णयामुळे संस्थेच्या ६२ वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांच्या नवीन शैक्षणिक वर्षाची सुरूवात कॅंपसमध्ये एकाही विद्यार्थ्याची उपस्थिती नसताना होणार आहे. येत्या काळात अन्य आयआयटी संस्थाही अशाप्रकारचं पाऊल उचलण्याची शक्यता आहे.