आयटी पार्कच्या समस्या सोडवण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम

0

हिंजवडी : राजीव गांधी आयटी पार्कच्या समस्या सोडविण्यासाठी कालबद्ध कार्यक्रम आखणार असून, याच्याशी संबंधित विविध विभागांमधील समन्वयासाठी जिल्हाधिकारी समन्वयक म्हणून काम पाहतील, अशी घोषणा पालकमंत्री गिरीष बापट यांनी केली. हिंजवडी येथील आयटी पार्कमधील उद्योजक व कर्मचार्‍यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी हिंजवडी इंडस्ट्रिज असोसिएशनच्या (एचआयए) कार्यालयात पार पडलेल्या बैठकीत ते बोलत होते.

यांची होती उपस्थिती
या बैठकीला जिल्हाधिकारी सौरभ राव, पीएमआरडीएचे महानगर आयुक्त किरण गित्ते, पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त अच्युत हांगे, नगर नियोजन विभागाचे उपसंचालक प्रकाश ठाकूर, परिवहन विभागाचे कार्यकारी अभियंते श्रीकांत सवणे, ज्ञानदेव जुंधारे, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी संतोषकुमार देशमुख, कार्यकारी अभियंता सुधीर नागे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता प्रवीण किडे, कार्यकारी अभियंता धनंजय देशपांडे, परिमंडळ तीनचे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे, वाहतूक विभागाचे उपायुक्त अशोक मोराळे, सहाय्यक आयुक्त राजेंद्र भामरे, वाहतूक पोलीस निरीक्षक दत्तात्रय पाटील उपस्थित होते. एचआयएच्या वतीने असोसिएशनचे अध्यक्ष अनिल पटवर्धन, सचिव डॉ. सतीश पै, व्यवस्थापन समितीचे इतर सदस्य, मुख्य कार्यवाहक अधिकारी तसेच टीसीएस, इन्फोसिस आणि विप्रो या आयटी कंपन्यांच्या केंद्र प्रमुखांसह वरिष्ठ अधिकार्‍यांनीदेखील बैठकीत सहभाग नोंदविला.

असोसिएशनने सुचविल्या उपाययोजना
दोन तास चाललेल्या या बैठकीत पालकमंत्र्यांनी असोसिएशनकडून प्रमुख पायाभूत सुविधांसह रस्ते, पार्किंग, वाहतूक, सुरक्षा आणि घनकचरा व्यवस्थापन आदी समस्यांबाबत माहिती जाणून घेतली. या समस्या सोडवण्यासाठी असोसिएशनने अल्प, मध्यम आणि दीर्घकालीन उपाययोजना सुचवल्या. या समस्या सोडवण्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे सांगून, पालकमंत्र्यांनी त्यासाठी एक कालबद्ध कार्यक्रम तयार करण्याची सूचना जिल्हाधिकार्‍यांना दिली. जिल्हाधिकारी विविध विभागांदरम्यान समन्वय ठेवतील, असेही ते म्हणाले. या समस्यांबद्दल दर दोन महिन्यांनी आढावा बैठक घेण्याचे आश्‍वासन पालकमंत्र्यांनी दिले. या संदर्भात पुढील बैठक सप्टेंबर महिन्यात होणार आहे.