कोलकाता । आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. 2021 साली भारतात होणारी एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची चॅम्पियन्स ट्रॉफी कायमची रद्द करून, आयसीसीने त्याऐवजी ट्वेन्टी-20च्या विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे यापुढे चॅम्पियन्स ट्रॉफीऐवजी ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धा पाहायला मिळणार आहे. एकदिवसीय क्रिकेट सामन्यांची विश्वचषक स्पर्धा असताना आठ संघांचा समावेश असलेल्या चॅम्पियन्स ट्रॉफीची गरज आहे का, असा प्रश्न सातत्याने विचारण्यात येत होता. त्या प्रश्नाला अखेर आयसीसीने कोलकात्यातल्या बैठकीत एकमताने उत्तर दिले आहे. आठ संघांमधल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या चॅम्पियन्स ट्रॉफीला आयसीसीने 2021 साली सोळा संघांच्या ट्वेन्टी-20 क्रिकेट विश्वचषकाचा पर्याय निश्चित केला आहे. त्यामुळे आता 2020 साली ऑस्ट्रेलियात आणि 2021 साली भारतात लागोपाठ दोन ट्वेन्टी-20 विश्वचषक स्पर्धांंचे आयोजन होणार आहे. आयसीसीची पाच दिवसीय बैठक कोलकात्यात पार पडली. या बैठकीनंतर मुख्य कार्यकारी अधिकारी डेव्ह रिचर्डसन यांनी सांगितले की, आयसीसीने सर्वानुमते 2021 मध्ये भारतात होणारी चॅम्पियन्स ट्रॉफी रद्द करण्याचा निर्णय घेतला. त्याऐवजी 16 संघांचा समावेश असणार्या ट्वेन्टी-20 मालिकेचे आयोजन करण्यात येईल. दरम्यान, सुरुवातीला भारताने आयसीसीच्या या निर्णयाला विरोध केला होता. मात्र, नंतर बीसीसीआयचे प्रतिनिधी अमिताभ चौधरी यांनी समर्थन केले.
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानकडे
2017 मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतील अंतिम सामन्यात भारताचा पाकिस्तानने दारुण पराभव केला. पाकिस्तानी संघाने ठेवलेले 339 धावांचे डोंगराएवढे लक्ष्य पार करताना भारताची चांगलीच दमछाक झाली होती. हार्दिक पंड्याच्या 76 धावांच्या बळावर भारताला सर्वबाद 158 धावांपर्यंतच मजल मारता आली. पाकिस्तानने भारताचा तब्बल 180 धावांनी धुव्वा उडवत विजेतेपद पटकावले होते.चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीत प्रवेश करुन तिसर्यांदा जेतेपद मिळवण्याची स्वप्न पाहणार्या टीम इंडियाला दारुण पराभवाला सामोरे जावे लागले होते.
क्रिकेटला जगभरात प्रसिद्धी मिळवण्याकरता आयसीसीने आपल्याला संलग्न असलेल्या 104 देशांच्या ट्वेन्टी 20 सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा देण्याची घोषणा केली आहे. हा नियम पुरुष संघाबरोबर महिला संघानाही लागू होणार आहे. महिला संघाच्या सामन्यांना आगामी 1 जुलैपासून तर पुरुष संघाच्या सामन्यांना पुढील वर्षी 1 जानेवारीपासून आंतरराष्ट्रीय सामन्यांचा दर्जा मिळणार आहे. याच धर्तीवर ट्वेन्टी 20 क्रिकेटमध्ये आंतरराष्ट्रीय मानांकन घोषित करण्यात येणार आहे. महिला आणि पुरुष संघांसाठी अनुक्रमे आगामी ऑक्टोबर आणि पुढील वर्षी मे महिन्यापासून जागतिक मानाकंन घोषित होतील.
दुसर्यांदा घडणार अशी घटना
आयसीसीच्या निर्णयामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या इतिहासात दुसर्यांदा सलग दोन वर्षे ट्वेन्टी 20 क्रिकेटची विश्वचषक स्पर्धा रंगणार आहे. 2021 च्या आधी 2020 मध्ये ऑस्ट्रेलियात ट्वेन्टी 20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा होणार आहे. याआधी 2009 मध्ये इंग्लंडमध्ये आणि त्यानंतर लगेचच पुढील वर्षी 2010 मध्ये वेस्टइंडिजमध्ये ट्वेन्टी 20 क्रिकेट विश्वचषक क्रिकेट स्पर्धा खेळवण्यात आली होती. आता 2019 आणि 2023 मध्ये 50 षटकांची विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. रिचर्डसन म्हणाले, चॅम्पियन्स ट्रॉफी क्रिकेट स्पर्धा बर्याच अंशी एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या जवळ जात होती. या दोन्ही स्पर्धांमध्ये फरक करणे अनेकदा कठीण व्हायचे.