मुंबई: आरबीआयने आज तिमाही पतधोरण जाहीर केले आहे. त्यात रेपो रेट आणि रिझर्व्ह रेपो रेट वाढण्याची शक्यता वर्तविली जात होती. मात्र ‘रेपो रेट जैसे थे’च ठेवण्यात आले आहे. त्यातच सध्या ३.५ टक्के असलेला महागाई दर ३.७ टक्क्यांवर जाण्याचा अंदाज आरबीआयकडून वर्तवण्यात आला आहे. आर्थिक आघाडीवर संकटात सापडलेल्या मोदी सरकारला आरबीआय रेपो रेट कमी करुन काहीसा दिलासा देईल, अशी अपेक्षा होती. मात्र अनेकांची अपेक्षा फोल ठरली. एका बाजूला विकास दर कमी राहील असा अंदाज व्यक्त करणाऱ्या आरबीआयने दुसऱ्या बाजूला महागाई वाढण्याची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे हा सरकारसाठी चिंतेची बाब आहे.
चालू आर्थिक वर्षात विकास दर वाढीचा वेग ६.१ टक्के राहील असा अंदाज वर्तवणाऱ्या आरबीआयने आता त्यात १.१ टक्क्याची कपात केली आहे. चालू आर्थिक वर्षात जीडीपी वाढीचा वेग ५ टक्केच राहील, असा अंदाज आरबीआयने व्यक्त केला आहे. त्यामुळे आर्थिक मंदीचे संकट आणखी वाढणार असल्याची शक्यता आहे.
सध्या रेपो रेट ५.१५ टक्के इतका आहे, तो कायम राहणार आहे. याआधी रिझर्व्ह बँकेनं रेपो रेटमध्ये ०.२५ टक्क्यांची कपात केली होती. त्याआधीही चार वेळा आरबीआयने रेपो रेट कमी करत मोदी सरकारला दिलासा दिला होता. काही दिवसांपूर्वी विकास दराचे आकडे जाहीर झाले. देशाच्या जीडीपीमध्ये मागील तिमाहीत केवळ ४.५ टक्क्यांची वाढ झाल्याचं त्यातून समोर आलं. जीडीपी वाढीचा हा गेल्या ६ वर्षांतील निच्चांक आहे. त्यामुळेच आरबीआय रेपो रेट कमी करेल अशी आशा अर्थ वर्तुळातील अनेकांसह सरकारलादेखील होती. मात्र या सगळ्यांनाच आरबीआयने जोरदार धक्का दिला.