आरोग्य विभागातील कंत्राटी कर्मचार्‍यांचे ठिय्या आंदोलन

0

जळगाव । आपल्या विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचार्‍यांनी 11 एप्रिल पासून कामबंद आंदोलन पुकारले असून यामध्ये जवळपास 400 कर्मचारी सहभागी झाले आहेत. या कर्मचार्‍यांनी जि.प.रसमोर ठिय्या देत घोषणाबाजी केली. या आंदोलनामुळे आरोग्य सेवेसह विविध कामांवर परिणाम झाला आहे. राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानातील कंत्राटी कर्मचाजयांना नियमित सेवेत सामावून घेण्याची या कर्मचार्‍यांची अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. यासाठी वारंवार पाठपुरावा करण्यात आला, तरीदेखील त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान अधिकारी, कर्मचारी महासंघाच्यावतीने 11 एप्रिलपासून कामबंद करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष विजय शिंदे यांनी सांगितले.

विविध सेवांवर परिणाम
समान काम, समान वेतन मिळावे, या मागणीसह विविध मागण्यांचे ठराव करण्याची मागणी आंदोलकांनी केली. त्या वेळी उज्ज्वला पाटील यांनी हा विषय राज्यस्तरावरचा असून तुम्ही तसा ठराव द्या, त्यावर चर्चा करू व तो वरिष्ठ पातळीवर पाठवू असे सांगितले. कर्मचार्‍यांच्या या कामबंदमुळे आरोग्य सेवेसह शालेय आरोग्य तपासणी, सिकलसेल तपासणी, निधी उपलब्धता, अभियानांतर्गत सुरू असलेल्या बांधकामांवरही परिणाम झाला आहे. जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तो पर्यंत कामबंद ठेवून दररोज सकाळी 10 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत जि.प. समोर ठिय्या देण्यात येईल.

400 कर्मचारी सहभागी
जिल्हाभरातील कर्मचार्‍यांनी काम बंद ठेवून जवळपास 400 कर्मचारी सकाळी 10 वाजेपासून जि.प. समोर ठिय्या मांडून बसले. या वेळी आंदोलकांनी मागण्यांसदर्भात घोषणा दिल्या. आंदोलनस्थळी जि.प. अध्यक्षा उज्ज्वला पाटील, उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, आरोग्य सभापती रवींद्र पाटील, शिक्षण सभापती पोपट भोळे, समाजकल्याण सभापती प्रभाकर सोनवणे, जि.प.सदस्य रविंद्र पाटील यांच्यासह जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बबिता कमलापूरकर आदींनी भेटी दिल्या.