बांगलादेश-श्रीलंका यांच्यात रंगणार पहिला सामना
मुंबई:भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने विश्रांती घेतली असली तरी भारत-पाकिस्तान यांच्यातील लढत नेहमीच क्रिकेटरसिकांसाठी खास पर्वणी राहिली आहे. याच पाश्र्वभूमीवर शनिवारपासून सुरू होणाऱ्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेकडे सर्वाचे डोळे लागले आहेत. सहा देशांचा सहभाग असलेल्या या स्पर्धेचा प्रारंभ बांगलादेश आणि श्रीलंका यांच्यातील सामन्याने होणार आहे.गेल्या काही वर्षांत बागंलादेशने या स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. २०१६ मध्ये मायभूमीत झालेल्या स्पर्धेत त्यांनी अंतिम फेरीपर्यंत धडक मारली होती. तसेच २०१२मध्येसुद्धा त्यांनी मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखाली अंतिम फेरीत मजल मारली होती. बागंलादेशची फलंदाजी अनुभवी तमिम इक्बाल आणि शकिब-अल-हसन यांच्यावर प्रामुख्याने अवलंबून आहे.