आशियाई कबड्डी स्पर्धेच्या विजेत्या महिला खेळाडूंचा सत्कार

0

मुंबई । आशियाई अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेतील विजेत्या भारतीय महिला संघाच्या कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांचा क्रीडा मंत्री विनोद तावडे यांनी सत्कार केला. सायली जाधव यांना राज्य शासनाच्या सेवेत सामावून घेण्यात येणार असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. कर्णधार अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांनी क्रीडा मंत्री तावडे यांची मंत्रालयात भेट घेतली. यावेळी या दोघींना प्रत्येकी सात लाख रुपयांचा धनादेश आणि शाल देवून तावडे यांनी सत्कार केला.

क्रीडा क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी करणार्‍या खेळाडूंचा उचित गौरव राज्य शासन करत आहेत. विविध पुरस्कारांसाठी ऑनलाईन प्रक्रिया सुरू केली आहे, असेही तावडे यांनी सांगितले. कबड्डी स्पर्धेमध्ये महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची संधी मिळालेल्या अभिलाषा म्हात्रे आणि सायली जाधव यांच्या खेळाचे तावडे यांनी यावेळी कौतुक केले. महाराष्ट्राच्या या दोन्ही कबड्डी पट्टुंना आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये जी संधी मिळाली, त्या संधीचे त्यांनी विजयात रुपांतर केले. या दोघींनी महाराष्ट्रासह भारताचे नाव कबड्डीमध्ये आंतरराष्ट्रीय स्तरावर नेले, असल्याचे तावडे यांनी यावेळी सांगितले. या सत्काराच्या वेळी खेळाडूंच्या परिवारातील सदस्य उपस्थित होते. शासनाकडून झालेल्या या सत्कारामुळे आनंदी असल्याची भावना या खेळाडूंनी व्यक्त केली. या सत्कारामुळे आम्हाला प्रेरणा मिळत असून आम्ही खेळ उंचावण्याचा प्रयत्न करू. यामुळे आमचा आनंद द्विगुणीत झाला असून निश्‍चितच राज्याची आणि देशाची मान उंचावण्याचा प्रयत्न राहील असे अभिलाषा म्हात्रे आणि खेळाडू सायली जाधव यांनी सांगितले.