मुंबई: इंडोनेशियामध्ये सुरु असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक पटकावणाऱ्या महाराष्ट्रातील खेळाडूंना राज्य शासनाकडून रोख पारितोषिके देण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. दरम्यान, या स्पर्धेत नेमबाजीमध्ये सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी करणाऱ्या राही सरनोबतचे मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केले आहे.
यंदाच्या आशियाई क्रीडा स्पर्धेत पदक विजेत्या महाराष्ट्राच्या खेळाडूंचा राज्य शासनाकडून रोख पारितोषिके देऊन गौरव करण्यात येणार आहे. यामध्ये सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी 50 लाख रुपये, रजत पदक विजेत्यांना प्रत्येकी 30 लाख आणि कांस्य पदक विजेत्यांना प्रत्येकी 20 लाख रुपये प्रदान करुन त्यांचा सन्मान करण्यात येईल, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केलेआहे. या स्पर्धेतील नेमबाजीमध्ये 25 मीटर क्रीडा प्रकारात भारतासाठी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी महाराष्ट्राची कन्या राही सरनोबतने केली असून आशियाई खेळांमध्ये नेमबाजीत सुवर्णपदक मिळवणारी ती पहिलीच भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. या विक्रमी कामगिरीबद्दल तिचेही मुख्यमंत्र्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.