इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रांमध्ये कोणताही फेरफार शक्य नाही

0

मुंबई : इलेक्ट्रॉनिक मतदानयंत्रे तयार करतानाच सुरक्षिततेबाबत तांत्रिकदृष्ट्या पुरेशी काळजी घेतलेली असल्यामुळे या यंत्रांत कुठल्याही प्रकारे फेरफार करणे शक्य नाही, असे स्पष्टीकरण राज्य निवडणूक आयुक्त ज. स. सहारिया यांनी मंगळवारी झालेल्या राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या बैठकीत केले.

राज्य निवडणूक आयोगाकडील नोंदणीकृत मान्यताप्राप्त राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची आयोगाच्या कार्यालयात बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते. भिवंडी- निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. आयोगाचे सचिव शेखर चन्ने यांच्यासह विविध राजकीय पक्षांचे प्रतिनिधी बैठकीस उपस्थित होते.

सार्वजनिक क्षेत्रातील इलेक्ट्रॉनिक कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड या कंपनीने तयार केलेली इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी वापरली जातात. मतदान यंत्रांसदर्भात आलेल्या तक्रारींबाबत कंपनीचे मुख्य व्यवस्थापकीय संचालकांसह विविध तज्ज्ञांबरोबरदेखील तपशीलवार चर्चा करण्यात आली आहे. मतदान यंत्रांच्या सुरक्षिततेबाबत संपूर्ण दक्षता घेण्यात आली असल्यामुळे त्यात फेरफार करणे शक्य नसल्याचे त्यांनी स्पष्टीकरण केले.

नुकत्याच झालेल्या महानगरपालिका, जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी भारत निवडणूक आयोगाने पाच जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध केलेली विधानसभेची मतदारयादी वापरण्यात आली होती. त्यात कुठलीही नावे राज्य निवडणूक आयोगाने वगळलेली नसल्याचे स्पष्ट करून सहारिया म्हणाले की, भिवंडी- निजामपूर, मालेगाव, लातूर, परभणी, चंद्रपूर व पनवेल महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठीदेखील पाच जानेवारी 2017 रोजी प्रसिद्ध झालेली मतदारयादी वापरण्यात येणार आहे. राजकीय पक्ष, उमेदवार व मतदारांच्या सोयीसाठी मतदानाच्या सुमारे तीन ते चार आठवडे आधी मतदान केंद्रनिहाय मतदारयादी प्रसिद्ध केली जाणार आहे तसेच या निवडणुकांसाठीदेखील इच्छूक उमेदवारांसाठी नामनिर्देशनपत्रे व शपथपत्रे भरण्यासाठी संगणकीय प्रणाली उपलब्ध करून दिली जाणार आहे.