उत्तर प्रदेशात जमिनीच्या वादातून माजी आमदाराची हत्या

0

लखनौ: उत्तर प्रदेशातील गुन्हेगारी दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. हत्यासत्र थांबत नाहीये. सामान्य नागरिक नाही तर तीन वेळा आमदार राहिलेल्या निर्वेंद्र मिश्रा यांची हत्या करण्यात आली आहे. जमिनीच्या वादातून ही हत्या करण्यात आली आहे. लखीमपूर खीरी विधानसभा मतदार संघातून ते तीन वेळा आमदार राहिलेले आहे. दोन वेळा ते अपक्ष म्हणून निवडून आले होते.

लखीमपूर खीरी येथे त्यांना बेदम मारहाण करण्यात आली. त्यात त्यांचा मृत्यू झाला. मिश्रा आणि विरोधी गटात जमिनीचा वाद होता. रविवारी दोन्ही गटात जमिनीवरून किरकोळ वाद सुरू झाला. त्यानंतर वाद शिगेला गेल्यानंतर हाणामारी सुरू झाली. यात मिश्रा यांना बेदम मारहाण करण्यात आली. गंभीर जखमी झालेल्या मिश्रा यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या वादात मिश्रा यांचा मुलगाही जखमी झाला असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मिश्रा यांच्या मृत्यूनंतर उत्तर प्रदेशातील कायदा सुव्यवस्थेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

या घटनेनंतर योगी सरकारवर टीका होत असून कारवाईची मागणी केली जात आहे. समाजवादी पार्टीचे नेते माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव, बहुजन समाजवादी पक्षाच्या नेत्या मायावती यांनी कारवाई कऱण्याची मागमी केली आहे. भाजप सरकारच्या काळात गुन्हेगारी वाढल्याचे आरोप करण्यात आले आहे.