वाचन संस्कृती रूजवण्यास रीड ग्रंथालय लावणार हातभार -आमदार संजय सावकारे
भुसावळ- तंत्रज्ञानाच्या युगात तंत्रज्ञान वापरामुळे बुध्दीचा वापर कमी होत आहे. पाहिजे ती गोष्ट एका क्लीकवर उपलब्ध होते मात्र यावर मिळवलेले ज्ञान हे चिरकाल टिकणारे नाही. उत्तर महाराष्ट्रातील पहिले भुसावळ गटसाधन केंद्राने शिक्षकांसाठी चालवलेले शिक्षकांचे रीड ग्रंथालय शिक्षकांमध्ये वाचन संस्कृती रूजवण्यास हातभार लावणार आहे. पुस्तकातून केलेले वाचन हे कायमस्वरूपी लक्षात राहते. वाचनामुळे अध्यापनात विविध उदाहरणे देत आनंददायी अध्यपन होण्यास मदत होणार असल्याचे मत आमदार संजय सावकारे यांनी येथे व्यक्त केले. भुसावळ येथील अहिल्यादेवी कन्या विद्यालयाच्या सभागृहात पंचायत समिती शिक्षण विभाग, गटसाधन केंद्र यांच्या वतीने शिक्षक, मुख्याध्यापक यांच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या शिक्षकांसाठीच्या रीड ग्रंथालयाचे उद्घाटन मंगळवारी झाले. याप्रसंगी आमदार सावकारे बोलत होते. त्यांच्या हस्ते फित कापून ग्रंथालयाचे उद्घाटन झाले.
तंत्रज्ञान युगात संवाद हरवले -आमदार सावकारे
अवांतर वाचनाच्या अभावामुळे अध्यापनात विद्यार्थ्यांना आनंद मिळत नाही. ती संकल्पना समजून घेण्याची त्यांची मानसिक तयारी नसत. मात्र तीच संकल्पना आनंददायी व विविध दाखले देवून पटवून दिल्यास विद्यार्थ्याना देखील संकल्पना समजून घेण्यात आनंद मिळतो. तंत्रज्ञानाच्या युगात प्रत्येक जण मोबाईलच्या आजुबाजूलाच वावरताना दिसतो. यामुळे एकमेकांमधील संवाददेखील दुरावले आहेत. शेजारी कोण आहे याचे भान देखील नसते. सुसंस्कृत पिढी घडविण्यात शिक्षकांची महत्वाची भूमिका आहे. यामुळे वाचनातून ही भूमिका पार पाडण्यात मदत होणार आहे. भविष्यात या ग्रंथालयाचा विस्तार वाढणारा असल्याचे सावकारे यांनी सांगितले.
ग्रंथालयाची संकल्पना उत्तम -पोपट भोळे
कार्यक्रमाचे उद्घाटक तथा जिल्हा परीषद शिक्षण सभापती पोपट तात्या भोळे म्हणाले की, गटसाधन केंद्राने शिक्षकांसाठी चालवलेल्या ग्रंथालयाची संकल्पना उत्तम आहे. गुणवंत, चारीत्र्यवान, आदर्श नागरीक हे वाचनातून घडले आहेत. थोर पुरूषांच्या चरीत्राचा अभ्यास केला तर आपल्याला लक्षात येते की, वाचनामुळे त्याच्या जीवनाला वळण मिळाले आहे. याकरीता शिक्षकांनी वाचन केले पाहिजे. तसेच विद्यार्थ्यांमधे देखील वाचन संस्कृती रूजवली पाहिजे.
वाचन संस्कृती रूजावी -सुमित्र अहिरे
प्रास्ताविकात विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे यांनी सांगितले की, गटसाधन केंद्राच्या वतीने रक्तदान शिबिर, कर्करोग ग्रस्ताला मदत, शिवजयंती असे नावीण्यपुर्ण उपक्रम राबवून शिक्षकांना एकत्र केले आहे. शिक्षकांमध्ये वाचन संस्कृती रूजली पाहिजे. त्या माध्यमातून वाचनाची आवड विद्यार्थ्यांना झाली पाहिजे.
शिक्षकांनी प्रगल्भता वाढविण्याची गरज- डॉ.ससाणे
डॉ.मदन ससाणे म्हणाले की, व्यक्तीने स्वतःला मार्गदर्शन केले पाहिजे. तरच शिकता येते. मनात शंका निर्माण झाल्याशिवाय ज्ञानाची निर्मिती होत नाही. साधनांचा उपयोग करून उद्दीष्ट गाठले पाहिजे. वाचनालयातील पुस्तके ही साधने तर अध्यापनातील संकल्पना विद्यार्थ्यांना शंभर टक्के समजणे हे उद्दिष्ट आहे. याकरीता वाचनालयातील विविध पुस्तकात दडलेले ज्ञान शिक्षकांनी मिळवून स्वत:मधील प्रगल्भता वाढविण्याचे आवाहन यावेळी त्यांनी केले.
शिक्षकांनी पुस्तकांची भेट द्यावी -बी.जे.पाटील
प्राथमिक शिक्षणाधिकारी बी.जे.पाटील म्हणाले की, प्रत्येक महिन्याला प्रत्येक शिक्षकाने एक नवीन पुस्तक विकत घ्यायचे. ते पुर्ण वाचायचे व रीड ग्रंथालयाला भेट द्यायचे यामुळे ग्रंथालयातील ज्ञानाचा संग्रह वाढणार आहे. विविध पुस्तके शिक्षकांना वाचायला मिळणार आहे. हा आदर्श उपक्रम इतर तालुक्याला राबविण्याासाठी देखील प्रयत्न करणार आहे.
यांचा झाला गौरव ः कार्यक्रमात रीड ग्रंथालयाला पुस्तकांची भरघोस मदत करणारे शारदा माध्यमिक विद्यालय, दीपनगरचे महेंद्र मेढे, रीड ग्रंथालयाची संकल्पना ज्यांच्यामुळे सुचली त्या भिलार दौर्यातील 16 शिक्षक, गटसाधन केंद्र सजविणार्या महिला व गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, विस्तार अधिकारी सुमित्र अहिरे, रागिी चव्हाण यांच्यासह केंद्रप्रमुखांचा स्मृती चिन्ह व पुस्तक देवून गौरव करण्यात आला. बियाणी इंग्लिश मिडीअम स्कूलने रीड ग्रंथालयाच्या लोगोची तर जि.प.शिक्षक ज्योती बेलसरे यांनी संविधान प्रास्ताविकाची प्रतिमा रीड ग्रंथालयाला भेट दिली.
यांची होती उपस्थिती
या कार्यक्रमास यावल प्रकल्प अधिकारी आर.बी.हिवाळे, पंचायत समिती सभापती सुनील महाजन, उपसभापती मनीषा पाटील, जिल्हा परीषद सदस्य पल्लवी सावकारे, शिक्षण समिती सदस्य रवींद्र पाटील, पंचायत समिती सदस्य विजय सुरवाडे, रावेर पंचायत समिती सदस्य दीपक पाटील, गटविकास अधिकारी सुभाष मावळे, गटशिक्षणाधिकारी महेंद्र धीमते, नगरपालिका शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी डी.टी.ठाकुर आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन शिक्षण विस्तार अधिकारी रागिणी चव्हाण यांनी तर आभार संजीव भटकर यांनी मानले.