उत्पन्न वाढविण्याचा संकल्प करा

0

नंदुरबार । पं तप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकर्‍यांना केंद्रबिंदू मानले असून गरीब, शेतकर्‍यांचे कल्याण हाच त्यांचा ध्यास आहे. त्यांनी शेतकर्‍यांच्या विकासासाठी विविध योजना आणल्या आहेत. या योजनांचा लाभ कृषी विभागाने सामान्य शेतकर्‍यांपर्यंत पोहोचवीत आगामी पाच वर्षांत शेतीचे उत्पन्न दुप्पटीने वाढविण्याचा संकल्प करावा, असे प्रतिपादन केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. सुभाष भामरे यांनी केले. ते कृषी विज्ञान केंद्र व कृषि विभाग आत्मा, नंदुरबार यांच्या संयुक्त विद्यमाने न्यू इंडिया मंथन : संकल्प ते सिध्दी या कार्यक्रमाचे उदघाटनाप्रसंगी बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, जिल्हा पोलीस अधिक्षक संजय पाटील, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी मधुकर पन्हाळे, डॉ. हेडगेवार सेवा समिती सचिव डॉ. नितीन पंचभाई, कृषि सल्लागार पुणे संतोष सहाणे, डॉ. हेडगेवार सेवा समिती अध्यक्ष कृष्णदास पाटील, उपाध्यक्ष रवी बेलपाठक, विजय चौधरी, आदी उपस्थित होते.

कृषि विज्ञान केंद्राची दिली माहिती
जिल्हाधिकारी डॉ.कलशेट्टी यांनी देखील मार्गदर्शन केले. हेडगेवार सेवा समिती सचिव डॉ. नितीन पंचभाई यांनी प्रास्ताविक केले. कृषि विज्ञान केंद्र प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी कृषि विज्ञान केंद्रामार्फत करणार्‍या येणार्‍या विविध कामकाजाची माहिती यावेळी दिली. सुत्रसंचालन कृषि विज्ञान केंद्राचे विषय विशेषज्ञ आर. एम. पाटील यांनी केले. तर आभार विषय विशेषज्ञ यु.डी. पाटील यांनी मानले. या कार्यक्रमास जिल्ह्यातील शेतकरी, कृषी विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

शेतकर्‍यांचा सत्कार
शेतकर्‍यांनी पंतप्रधान पीक विमा योजनेचा लाभ घ्यावा. जमिनीच्या आरोग्यपत्रिका तयार करुन घ्यावी. शास्त्रोक्त व आधुनिक पध्दतीने शेती करीत शेतकर्‍यांनी प्रगती साधावी. तसेच आगामी काळात कोल्ड स्टोरेज आणण्यासाठी आपले प्रयत्न राहतील. त्यामुळे कांद्यासारखा शेतमाल तेथे ठेवता येईल आणि योग्य दर मिळाल्यावर शेतकरी त्याची विक्री करू शकेल. केंद्रीय मंत्री डॉ. भामरे यांनी यावेळी उपस्थितांना सुराज्य आणण्याचा संकल्प करण्याची शपथ दिली. तत्पूर्वी त्यांनी विविध स्टॉलची पाहणी केली. यावेळी एक एकर शेतीत उत्कृष्ट भाजीपाल्याची फेरपालट करणार्‍या टेटीबाई पावरा, महाराष्ट्र शासनाचा जिजामाता पुरस्कार प्राप्त सुनिताबाई रावताळे, नचिकेत पुरुष बचत गट प्रमुख ईश्वर गावीत व गांडूळ खत प्रकल्पात उत्कृष्ट काम करणारे मानसिंग वळवी या यशस्वी शेतकर्‍यांचा केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉ. भामरे यांच्या हस्ते शाल श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला.

पूरक जोड व्यवसाय केल्यास प्रगती
डॉ.भामरे पुढे म्हणाले की, नंदुरबार जिल्ह्यातील शेतकरी अतिशय कष्टाळू आहेत. काम करण्याची त्यांच्यात ताकद आहे. त्याला वीज, पाणी, शेतमालाला योग्य भाव आणि शेतीला पूरक जोड व्यवसाय केला, तर तो प्रगती करू शकेल. या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी शेतकरी विकासासाठी विविध योजना जाहीर केल्या आहेत. या योजना कृषी विज्ञान केंद्र व कृषी विभागाने प्रत्येक गावातील प्रत्येक शेतकर्‍यापर्यंत शासनाच्या योजना पोहोचविल्या पाहिजेत. कृषी विभागाला शेतकर्‍यांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे. या संधीचा लाभ घेत कृषी विभागाने सामान्य शेतकर्‍यापर्यंत शासकीय योजनांचे लाभ पोहोचवावेत असे आवाहन डॉ. भामरे यांनी केले.