उन्नाव प्रकरणी वेगळा न्याय का?; लोकसभेत विरोधक आक्रमक !

0

नवी दिल्ली: हैदराबादमधील वेटरनरी डॉ.प्रियांका रेड्डीवर पाशवी बलात्कार करून जाळण्यात आले. संपूर्ण देशात यावरून संताप व्यक्त होत होता. आरोपींना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी होत असताना आज पहाटे सर्व चारही आरोपींचा एन्काऊंटर करून ठार करण्यात आले. संपूर्ण देशात यावरून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहे. पोलिसांचे कौतुक होत असताना पोलिसांचा भूमिकेवर संशय व्यक्त होत आहे. दरम्यान यावरून उन्नाव येथील बलात्कार पीडित तरुणीला न्याय देण्याची मागणी होत आहे. लोकसभेत उन्नाव पीडित तरुणीच्या बाबतीत वेगळा न्याय का? हैदराबादप्रमाणे उन्नाव बलात्कारातील आरोपीलाही ठार करावे अशी मागणी लोकसभेत झाली. यावरून कॉंग्रेसने जोरदार गदारोळ केला. सत्ताधारी आणि विरोधकांनी एकमेकांवर आरोप प्रत्यारोप केले.

लोकसभेत महिला सुरक्षेचा मुद्दा चर्चेत असताना काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांनी सरकारवर जोरदार टीका केली. एकीकडे देशात रामाचं मंदिर बनविले जाणार आहेत तर दुसरीकडे सीतामातेला जाळण्याचे काम होत आहे. उन्नावमध्ये बलात्कार पीडितेला जाळण्यात आले. उन्नावच्या घटनेत सरकार आणि पोलीस अपयशी ठरलेत असा आरोप त्यांनी केला.

अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी पलटवार केला. त्यांनी महिला सन्मानाचा विषय धर्माशी जोडणे चुकीचे आहे. बंगाल पंचायत निवडणुकीत बलात्काराला राजकीय हत्यार म्हणून वापरले जते. बंगालमधील एक खासदार आज मंदिराचं नाव घेतात. ज्यांनी बलात्काराचा राजकीय फायद्यासाठी वापर केला ते भाषण देतायेत. उन्नाव असेल वा तेलंगणा ज्या घटना घडल्या ते दुर्दैवी आहेत. दोषींनी फाशी मिळायला हवी पण त्यावर राजकारण करु नका असे त्यांनी सांगितले.

शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी महिला सुरक्षेसाठी कडक कायद्याची गरज असून अशाप्रकारचे गुन्हे थेट सुप्रीम कोर्टात सुनावणीसाठी यावेत. सध्याच्या न्याय प्रक्रियेमध्ये कनिष्ठ न्यायालयापासून हे सुरु होते. अनेक खटले वर्षोनुवर्ष सुरुच राहतात. त्यामुळे या मुद्द्यावर लोकसभा अध्यक्षांनी समिती गठित करुन चर्चा करावी अशी मागणी त्यांनी केली आहे.