उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांना मागदर्शक सुचना

         जळगाव : –  जळगाव जिल्ह्यात 29 ते 31 मार्च, 2022 या कालावधीत तापमानात वाढ होणार असुन या तीन दिवसात जिल्ह्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.  उष्णतेच्या लाटेपासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी काय करावे व काय करु नये याबाबतच्या मागदर्शक सुचना.

                 काय करावे – तहान लागलेली नसली तरी सुध्दा जास्तीत जास्त पाणी पिण्यात यावे, हलकी, पातळ व सच्छिद्र सुती कपडे वापरावेत, बाहेर जातांना गॉगल्स, छत्री, टोपी, बुट व चप्पलचा वापर करण्यात यावा,  प्रवास करतांना पाण्याची बाटली सोबत ठेवावी, उन्हात काम करीत असलेल्या व्यक्तीनी डोक्यावर टोपी किंवा छत्रीचा वापर करण्यात यावा, तसेच ओल्या कपडयांनी डोके, मान व चेहरा झाकण्यात यावा, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होत असल्यास ओआरएस, घरी बनविण्यात आलेली लस्सी, तोरणी, लिंबू- पाणी, ताक इत्यादींचा नियमित वापर करण्यात यावा, अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम इत्यादी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावित व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा,

                तसेच गुरांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच त्यांना पुरेसे पिण्याचे पाणी दयावे, घरे थंड ठेवण्यासाठी पडदे, शटर व सनशेडचा वापर करण्यात यावा. रात्री खिडक्या उघडया ठेवण्यात याव्यात, पंखे, ओले कपडे यांचा वापर करण्यात यावा, तसेच थंड पाण्याने वेळोवेळी स्नान करण्यात यावे, कामाच्या ठिकाणी जवळच थंड पिण्याच्या  पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, सुर्य प्रकाशाच्या थेट संबंध टाळण्यासाठी कामगारांना सुचित करण्यात यावे, पहाटेच्या वेळी जास्तीत जास्त कामाचा निपटारा करण्यात यावा, बाहेर कामकाज करीत असताना मध्ये मध्ये विश्रांती घेऊन नियमित आराम करण्यात यावा, गरो़दर महिला कामगार व आजारी कामगारांची अधिकची काळजी घेण्यात यावी, रस्ताच्या कडेला उन्हापासून संरक्षणाकरिता शेड उभारावेत, जागोजागी पाणपोईची सुविधा करण्यात यावी,

काय करु नये – लहान मुले किंवा पाळीव प्राण्यांना बंद असलेल्या व पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये, दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत उन्हात बाहेर जाणे टाळावे, गडद, घट्ट व जाड कपडे घालण्याचे टाळावे, बाहेर तापमान अधिक असल्यास शारिरीक श्रमाची कामे टाळावीत, दुपारी 12.00 ते 3.30 या कालावधीत बाहेर काम करणे टाळावे, उन्हाच्या कालावधीत स्वयंपाक करण्याचे टाळण्यात यावे, तसेच मोकळया हवेसाठी स्वयंपाक घराची दारे व खिडकी उघडी ठेवण्यात यावी. असे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा निवासी उपजिल्हाधिकारी राहुल पाटील यांनी एका प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकान्वये कळविलेआहे.