मुंबई: राज्यसभेच्या ५५ जागांसाठी २६ मार्च रोजी निवडणूक होत आहे. त्यात महाराष्ट्रातील सात जागांचा समावेश आहे. या निवडणुकीसाठी भाजपाकडून एकनाथराव खडसे, केंद्रीयमंत्री रामदास आठवले, उदयनराजे भोसले यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याची माहिती आहे. तर राष्ट्रवादी कॉंग्रेसतर्फे पक्षाध्यक्ष शरद पवार, माजी राज्यमंत्री फौजिया खान यांची उमेदवारी निश्चित करण्यात आल्याची माहिती आहे.
राज्यसभेच्या जागांवरील सदस्यांचा कार्यकाळ एप्रिल महिन्यात संपुष्टात येत आहे. राष्ट्रवादीकडून शरद पवार, माजिद मेमन निवृत्त होत आहेत. त्यामुळे, मेमन यांच्याऐवजी फौजिया खान यांना संधी देण्याचे राष्ट्रवादीच्या नेतृत्वाने निश्चित केल्याचे समजते. तर, राज्यातील भाजप नेतृत्वाने उदयनराजे भोसलेंना राज्यसभेवर पाठवण्याची तयारी सुरु आहे. तसेच, भाजपात नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसेंनाही राज्यसभेत पाठविण्याची तयारी भाजपाने सुरू केली आहे. यासोबतच, रामदास आठवलेंची खासदारकी कायम ठेवण्यात येत असल्याची सुत्रांची माहिती आहे.
उदयनराजे भोसलेंनी भाजपात प्रवेश केल्यानंतर आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला होता. त्यानंतर, झालेल्या पोटनिवडणुकीत उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला. तर, एकनाथ खडसेंनीही जाहीरपणे राज्य नेतृत्वाबद्दल आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे, भाजपाकडून या दोन्ही नेत्यांचं समाधान करण्यात येत आहे.