Eknath Shinde as Chief Minister and Deputy Chief Minister Devendra Fadnavis मुंबई : महाराष्ट्राचे 30 वे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ संभाजी शिंदे यांनी राजभवनात शपथ घेतली तर उपमुख्यमंत्रीपदी देवेंद्र गंगाधरराव फडणवीस यांनी शपथ घेतली. भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नवे मुख्यमंत्री हे एकनाथ शिंदे असतील, अशी मोठी घोषणा केली होती शिवाय या सरकारला माझे समर्थन असेल, असे सांगितले होते मात्र यानंतर अवघ्या दिड तासात प्रचंड राजकीय घडामोडी घडल्यानंतर भाजपाच्या वरीष्ठ नेतृत्वाने फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपदाची सूत्रे स्वीकारण्याबाबत निर्देश दिले. उभयंतांना राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पद व गोपनीयतेची शपथ दिली.
राज्यपालांकडे केला होता सत्तेचा दावा
गुरुवारी दुपारी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांची भेट घेऊन सत्तेचा दावा दाखल केला होता. यानंतर पत्रकार परीषद घेण्यात आली. यात त्यांनी सर्वांना धक्का देत शिंदे यांचे नाव जाहीर केले. याप्रसंगी फडणवीस म्हणाले की, सायंकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहे. ते एकटेच मुख्यमंत्री बनणार आहेत. भारतीय जनता पक्षाच्या गटाने त्यांना पूर्णपणे समर्थन दिले आहे. मी स्वत: या मंत्रीमंडळात राहणार नसल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले होते. यानंतर मात्र तासाभरातच भाजपचे केंद्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी एक व्हिडीओ संदेश जारी केला. यात ते म्हणाले की, भारतीय जनता पक्षाला सत्तेचा मोह नसून याचमुळे आम्ही शिंदे यांना पाठिंबा दिला आहे. फडणवीस यांनी मंत्रीमंडळात राहणार नसल्याचे जाहीर केले नसलेतरी फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री बनावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती तर यानंतर ट्विट करून त्यांनी फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनणार असल्याचे ट्विट केले. लागलीच अमित शाह यांनी देखील ट्विट करून फडणवीस हे उपमुख्यमंत्री बनणार असल्याचे जाहीर केले. यामुळे राजभवनात एकनाथ शिंदे यांच्यासोबत देवेंद्र फडणवीस यांच्या शपथविधीची तयारी करण्यात आली.
एकनाथ शिंदेंनी केले स्व.बाळासाहेबांसह स्व.आनंद दिघेंचे स्मरण
गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजेच्या सुमारास राजभवनातील दरबार हॉलमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे आगमन झाले. प्रारंभी एकनाथ शिंदे यांनी ईश्वराला साक्ष ठेवत मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांनी प्रारंभी शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे स्मरण केले तर देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यामुळे आता राज्यात शिवसेनेचा बंडखोर गट, भाजप आणि अपक्ष यांच्या आघाडीचे सरकार सत्तारूढ झाले आहे.