मुंबई: – कोविड१९ साथीच्या पार्श्वभूमीवर शासकीय तसेच महापालिका आणि खासगी रुग्णालयांमध्ये येणाऱ्या रुग्णांची तपासणी करून त्यांना उपचार देण्यात यावेत,उपचाराविना रुग्णांना परत पाठविण्यात येऊ नये, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज येथे दिले.
मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार आज राज्य शासनामार्फत अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, अन्य कुठलेही आजार नसलेल्या आणि कोविड १९ लक्षणे नसलेल्या परंतु कोविड १९ पॉझिटिव्ह असलेल्या रुग्णांना कोरोना निगा केंद्रांमध्ये (कोविड केअर सेंटर – सीसीसी) पाठवावे. खासगी रुग्णालयांनी मात्र अशा रुग्णांना होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी राहण्याचा त्यांना सल्ला द्यावा, असे अधिसूचनेत म्हंटले आहे.
कुठलाही रुग्ण मग तो कोरोना संशयित असो वा अन्य आजाराने ग्रासलेला असो, तो रुग्णालायत आल्यावर तातडीने त्याची अपघात विभागात किंवा तपासणी केंद्रामध्ये तपासणी झाली पाहिजे. अशावेळी जागेच्या उपलब्धतेनुसार तेथे रुग्णांच्या तपासणीकरिता स्वतंत्र व्यवस्था निर्माण करून किंवा विलगीकरणाची सोय करून रुग्ण तपासणी केली जावी. मात्र कुठल्याही परिस्थितीत एकही रुग्ण तपासणी आणि उपचाराविना परत जाता कामा नये याची दखल घेतली पाहिजे, असे या आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. रुग्णांची तपासणी, त्याला अन्यत्र हलविणे, दाखल करून घेणे आणि घरी सोडणे याबाबत आरोग्य सेवा संचालकांनी प्रमाणित कार्यपद्धती (एसओपी) तयार करावी , असे निर्देशही या आदेशात देण्यात आले आहेत.