मुंबई : माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. शिवसेना पक्ष प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना शिवसेनेचा मुख्यमंत्री बनवेल असे वचन दिल्याचे म्हणतात, मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाच्या जीवावर शिवसेनेच्या मुख्यमंत्री बनवणार असल्याचे वचन दिले होते का? असा चिमटा त्यांनी काढला आहे. तसेच आम्ही एक मोहीम गमावली म्हणून, पूर्ण लढाई हरलो असं होत नसल्याचे सुद्धा त्यांनी स्पष्ट केले आहे.
काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षासोबत जाण्याच्या निर्णयावरून बाळासाहेब ठाकरे यांनी तुम्हाला कधीच माफ केलं नसतं. तसेच विश्वासघात तर झालाच आहे, मात्र आता रडायचं नाही तर लढायचं. त्यामुळे भाजपच्या कार्यकर्त्याने मैदानात उतरले पाहिजे,असे फडणवीस म्हणाले. तर आता ही लढाई आपल्याला जिंकायची असून, एखादी मोहीम हरल्याने ती लढाई मागे पुढे होत नसल्याचा सल्ला त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांना दिला आहे.
एखाद्या विश्वासघाताने सरकार गेले तर आपण हात-पाय गाळून बसणाऱ्यांपैकी नाही. त्यामुळे विरोधी पक्षांची भूमिका सुद्धा ताकदीने निभावली पाहिजे. अंग चोरून काम होत नाही. विरोधी पक्षात काम करायचे असेल तर रस्त्यावर भिडाव लागतं, समाजाच्या वेदना मांडाव्या लागतात, असेही ते म्हणाले.