एपीएमसी मार्केटमध्ये कांदा महागला

0

नेरुळ । मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा बटाटा मार्केटमध्ये कांदा 40 रुपये किलो या दराने विकला गेला. स्थानिक बाजारात हा कांदा गृहिणींना 45 ते 50 रूपये या दराने खरेदी करावा लागणार आहे. शनिवारी मार्केटमध्ये 120 ट्रक भरून कांदा विक्रीसाठी आला. यामध्ये 40 ट्रक भरून नवीन कांदा तर 80 ट्रक जुना कांदा विक्रीसाठी आला. नवीन कांद्याची आवक न वाढल्याने अजून 10 ते 15 दिवस कांदा ग्राहकांना महाग दरानेच खरेदी करावा लागणार आहे. अवकाळी पावसाचा फटका बसल्याने शेती उफाळली. परिणामी कांदा उत्पादनास उशीर झाला. अवकाळी पाऊसामुळे कांदा उत्पादकांचे खूप नुकसान झाले.

आज मार्केटमध्ये नवीन कांदा 35 ते 40 रूपये आणि जुना कांदा 35 ते 38 रुपये या दराने विकला गेला. अजून 10 ते 12 दिवसांनी नवीन कांद्याची आवक वाढल्यानंतरच कांद्याच्या किंमतीत घसरण होण्याची शक्यता कांदा बटाटा मार्केटचे माजी संचालक अशोक वाळूंज यांनी व्यक्त केली आहे.