एमएमआरडीए आराखड्याविरोधातील आझाद मैदानात हल्लाबोल

0

मुंबई : एमएमआरडीएच्या प्रारूप आराखड्यातून वसई-विरारपासून पनवेल, उरण, पेण, अलिबाग पर्यंत नवे संकट शासनाने आणले असल्याने त्याचा निषेध करण्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात जनतेचा विकास आराखडा मंच, मुंबईच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले. संध्याकाळी नगरविकास खात्याचे सचिव नितीन किरीर यांच्या दालनात झालेल्या बैठकीत आंदोलनकर्त्या शिष्टमंडळाने आपले म्हणणे जोरदारपणे मांडत बिल्डर धार्जिण्या आराखड्याचा निषेध केला. शिष्टमंडळात मंचाचे मार्गदर्शक चंद्रशेखर प्रभू, आमदार मनोहर भोईर, उल्का महाजन, सुरेखा दळवी, मनवेल तुस्कानो, एस.एस. पाटील, संजय ठाकूर संतोष ठाकूर आदींचा सहभाग होता. यावेळी आमदार मनोहर भोईर यांनी येत्या काही दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बैठक लावणार असल्याचे सांगितले.

या आंदोलनात पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातून आलेल्या जनतेत उरणच्या पूर्व भागातील जनतेची उपस्थिती उठून दिसत होती. सरकारच्या धोरणाचा निषेध करत बिल्डरधार्जिना आराखडा रद्द करावा, स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घेऊन सर्वसामान्यांना अभिप्रेत असलेला आराखडा बनवावा अशी मागणी केली. उरण तालुक्यातून कामगार नेते श्याम म्हात्रे, जि.प. सदस्य बाजीराव परदेशी, माजी जि.प. सदस्य संतोष ठाकूर, जीवन गावंड, विनोद म्हात्रे, पं. स. सदस्या शुभांगी पाटील, सुरेश पाटील व सर्वपक्षीय जनता आंदोलनात सहभागी होती.

आंदोलनकर्त्यांच्या मागण्या
गावठाण विस्तार करा, डी सी रुल मराठीत करावेत, डी सी रुल सरसकट सर्वांना लागू करू नयेत, त्या त्या जिल्ह्यातील विभागवार भौगोलीक रचना, विकास पाहून ते लागू करावेत, हरकतींच्या सुनावण्या प्रत्येक गावासाठी एक स्वतंत्र घ्यावी, नियोजन करताना स्थानिक स्वराज्य संस्थांना विश्वासात घ्यावे.