‘ऑनलाईन’मुळे आली आत्महत्येची वेळ

0

औरंगाबाद । राज्य सरकारकडून राबवल्या जाणार्‍या ऑनलाईन प्रक्रियेवरून शेतकरी संतप्त झाले आहेत. कर्जमाफी हवी असेल तर ऑनलाईन अर्ज करा, बोंडअळीची लागण झाली की ऑनलाईन अर्ज करा, वीजेच्या जोडणीसाठीही ऑनलाईन अर्ज करा, या ऑनलाइन अर्जामुळेच शेतकर्‍यांना आत्महत्या करण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात एका शेतकर्‍याने कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांना सुनावले. सदाभाऊ खोत यांनी शनिवारी शहरात एक आढावा बैठक घेतली.

शेतात भेट दिली असता शेतकच्याचा सवाल
त्यानंतर सायंकाळी शहराजवळ असलेल्या बाळापूर शिवारात सदाभाऊंनी एका कापसाच्या शेतीस भेट दिली असता, तेथील शेतकर्‍यांनी हमीभावासह कर्जमाफी, भारनियमन आशा विषयावर प्रश्‍न विचारले. कापसावरील बोंडअळी, विजेचे भारनियमन, हमीभाव याबाबतच्या समस्या त्यांना सांगितल्या. या शेत भेटीवेळी एरव्ही शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांकडे दुर्लक्ष करणारे वीज वितरण अधिकारी, कृषी अधिकारी, असा लवाजमा सदाभाऊंसोबत उपस्थित होता. त्यावेळी शेतकर्‍यांनी या अधिकार्‍यांना कापूस पिकांवरील बोडअळीची समस्या सांगितल्यास कोणताही अधिकारी भेट देण्यास येत नाही. किमान झालेल्या नुकसानीची पाहणी तरी करायला हवी होती. मात्र, हे अधिकारी फक्त मंत्री आल्यावरच फिरकतात बाकीच्या समस्यांवर ऑनलाईन अर्ज करायला सांगतात. आम्ही काय आत्महत्या करायची का ? असा परखड सवाल शेतकर्‍रानी केला.