वरणगाव : गेल्या काही वर्षांपूर्वी मुक्ताईनगर मतदारसंघातील ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याची भीषण समस्या होती. ही समस्या सोडविण्यासाठी माजीमंत्री आमदार एकनाथराव खडसे यांनी योजना मजूर व्हावी यासाठी प्रयत्न केले होते. यानंतर 81 गाव पाणीपुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली होती. यातील काही गावे वगळता पाणीपुरवठा योजना सुरळीत सुरू आहे. मात्र या योजनेसाठी जिल्हा परिषद विभागाकडून कालबाह्य झालेली योजनेची दुरुस्ती व कर्मचार्यांचे गेल्या चार महिन्यांपासून वेतन रखडल्याने त्यांच्या कुटूंबियांवर उपासमारीची वेळ आली आहे.
जिल्ह्यातील भुसावळ, मुक्ताईनगर, बोदवड तालुक्यामधील ग्रामीण भागात पूर्वीपासूनच पिण्याच्या पाण्याची समस्या गंभीर असल्याकारणाने तत्कालीन कॉग्रेस शासनाच्या नियोजनानुसार 81 गाव पाणीपुरवठा योजना सुरु करण्यात आली होती. त्यावेळी मुक्ताईनगर तालुक्यातील हरताळा फाट्याजवळ महामार्गालगत उंच टेकडीवर कोट्यावधी रूपये खर्चून जलशुध्दीकरण केंद्राचे बांधकाम करण्यात आले आहे.
80 ते 90 कर्मचार्यांची नियुक्ती
या योजनेला पाण्याचा पुरवठा व्हावा याकरीता मुक्ताईनगर तालुक्यातील पुर्णा नदीवरून पाण्याचा पंपीग हाऊसच्या माध्यमातून उचल करण्यात आला आहे. योजनेच्या कामाची देखभाल दुरुस्ती व चांगल्या सेवेकरीता शासन स्तरावरून 80 ते 90 कर्मचार्यांची नियुक्ती देखील करण्यात आली आहे. त्यावेळी योजनेकरिता 81 गावांचे नियोजन होते. मात्र यातील काही ग्रामपंचायतीने स्वतंत्र पाणी पुरवठा योजना स्वतः कार्यान्वीत करुन घेतल्याने योजनेत फक्त बोटावर मोजन्या इतकेच गावे शिल्लक राहील्याने ही योजना आज रोजी मोडकळीस निघाली आहे.
ओडिए पाणी पुरवठा योजना कालबाह्य
सर्वात मोठी लोकसहभाग हे वैशिष्ट असलेल्या 81 गावांची ओडिए पाणी पुरवठा योजना दहा वर्षांपासून कालबाह्य झाली आहे. शासनाचे दुर्लक्ष झालेले दिसून येत आहे. ओडिएच्या पूर्ण जीवन करण्यासाठी सुमारे 100 कोटी खर्च अपेक्षीत आहे. सन 2006 मध्ये कालबाह्य झालेल्या ओडिए योजनेला मिळणारे शासकिय अनुदान बंद झाल्याने व आजपर्यंत या योजनेची एकदाही दुरुस्ती करण्यात आली नाही.
तसेच देखभाल दुरुस्तीसाठी जिल्हा परिषदेच्या अनुदानावर ही योजना निर्धार असून यासाठी लागणारी वार्षिक 5 कोटी निधी जिल्हा परिषदेला स्वतच्या फंडातून देणे अश्यक्य असल्याने ही योजना कार्यान्वित होण्याकामी अडचणी येत आहे. मात्र 20 वर्षांचा या योजनेचा कार्यकाळ संपल्याने तांत्रीक दोष निर्माण होतात तर बंद झालेल्या शासकीय अनुदानामुळे सम मधील मशनरी, फिल्टर मशनरी, प्रयोगशाळा आदी साहीत्य कालबाह्य झालेले आहे. या कारणामुळे या ओडिए योजनेवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये गावकर्याचा या योजनेवर रोष असून पाणीपट्टीची थकबाकी दिसून येते योग्य पाणी पुरवठा मिळणे कामी जिल्हा परिषदेने लवकरात लवकर अनुदानाला सुरुवात करून ही योजना पुनःजीवन करावे अशी अपेक्षा नागरीकांनी
केली आहे.
सदरील पाणीपुरवठा योजनेचा विषय खुप जुना असल्याने त्यासंबंधी माझ्यापर्यंत याविषयी व योजनेतील कर्मचार्यांविषयी कोणतीही माहिती नाही. तरीही या संदर्भात लवकरच चौकशी करुन योग्य तो निर्णय घेतला जाईल.
-आस्तिककुमार पांडेय, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, जळगाव