औरंगाबाद : औरंगाबादच्या छावणी भागात गॅस्ट्रो आजाराने थैमान घातले असून सुमारे 938 रूग्णांना उपचारांसाठी शासकीय रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. 938 पैकी 600 रूग्णांना अॅडमिट करून घेण्यात आले. तर अनेकांना उपचार करून घरी पाठवण्यात आले आहे. या आजाराच्या फैलावामुळे जिल्हा प्रशासनासह राज्याचे आरोग्य खातेही हादरले आहे.
शेकडो लोकांना मळमळ, उलटी, जुलाब
सध्या परिस्थिती नियंत्रणात असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगितले जात असले तरी मोठ्याप्रमाणावर उपाययोजना सुरू करण्यात आल्या आहेत. छावणी भागात राहणार्या शेकडो लोकांना मळमळ, उलटी, जुलाब याचा त्रास होऊ लागला. त्यामुळे अनेकांनी उपचारांसाठी शासकीय रूग्णालय गाठले. लहान मुले, महिला, पुरूष, ज्येष्ठ नागरिक अशा सगळ्यांचाच यामध्ये समावेश आहे. रूग्णांच्या वाढत्या संख्येमुळे अनेकांना जमिनीवर ठेवून उपचार घ्यावे लागले असेही डॉक्टरांनी सांगितले.
पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण
गॅस्ट्रोचे रूग्ण वाढल्याने छावणी परिसरातील सैन्य दलाच्या रूग्णालयातही काही रूग्णांना दाखल करण्यात आले आहे असेही डॉक्टरांनी सांगितले. व्हॉल्वच्या दुरूस्तीमुळे छावणी परिसराला औरंगाबाद महापालिकेकडून पुरवले जाणारे पाणी बंद झाले आहे. त्यामुळे सैन्य दलासाठी जे पाणी पुरवले जाते तेच पाणी येथील स्थानिकांनाही दिले जाते आहे. या पाण्यामुळेच गॅस्ट्रोची लागण एवढ्या मोठ्या प्रमाणावर झाली असावी असा अंदाज व्यक्त होतो आहे.