औरंगाबाद । नागपूर-मुंबई या 710 किलोमीटरच्या समृद्धी मार्गाच्या विरोधात आता शिवसेना रस्त्यावर उतरली आहे. दौलताबादजवळील माळीवाडा तर औरंगाबाद शहरापासून जवळ असलेल्या जालना रोडवरील कँब्रिज चौकात आज (बुधवार) शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकर्यांनी रास्ता रोको केला. त्यामुळे काही काळासाठी वाहतूक विस्कळीत झाली होती.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी औरंगाबादेत शेतकर्यांशी संवाद साधला होता. त्यावेळी समृद्धी मार्गात जमीन जाणार्या शेतकर्यांनी उद्धव ठाकरे यांच्यासमोर व्यथा मांडल्या होत्या. यानंतर आता शिवसेने समृद्धीच्या प्रकरणात आक्रमक होत काही दिवसांपुर्वी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. त्यामुळे आज माळीवाडा आणि कँब्रिज चौकात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. माळीवाड्यात आंदोलनामुळे काही वेळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. येथे शिवसेना जिल्हा प्रमुख अंबादास दानवे, कृष्णा पाटील डोणगावकर, नंदकुमार घोडेले यांनी आंदोलन केले. तर कँब्रिज चौकात शिवसेना संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर, नरेंद्र त्रिवेद, अण्णासाहेब माने, बाबासाहेब डांगे, रमेश दहीहंडे, नानासाहेब पळसकर यांच्या उपस्थितीत शेतकर्यांनी रास्ता रोको आंदोलन केले.
नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग हा दहा जिल्ह्यातून जाणार आहे. यामध्ये 30 तालुके, 354 गावातील रस्ता आणि नवनगरांसाठी 20 हजार 820 हेक्टर जमीन संपादीत केली जाणार आहे. यासाठी 46 हजार कोटी रुपये लागतील एवढी मोठी रक्कम कोठून उभारली जाणार आहे असा सवाल आंदोलकांनी उपस्थितीत केला आहे.