कत्तलीच्या उद्देशाने गुरांची निदर्यतेने वाहतूक : 11 बैलांची सुटका ; दोघांना बेड्या

जळगाव : गुरांची अत्यंत निर्दयतेने कोंबून वाहतूक केल्याप्रकरणी ट्रक मालक व चालकाविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली तर 11 गुरांची सुटका करण्यात आली. जळगावच्या एमआयडीसी पोलिसांनी नशिराबाद ते औरंगाबाद रोडवरील उमाळा फाट्याजवळील बसस्थानकाजवळून बुधवारी रात्री 10 वाजता ही कारवाई केली.

गोपनीय माहितीवरून कारवाई
एमआयडीसी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नशिराबाद औरंगाबाद रोडवरून ट्रकमध्ये 11 बैल निर्दयीपणे कोंबून कत्तलीसाठी नेत असल्याची गोपनीय माहिती एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक बुधवारी 6 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता नशिराबाद -औरंगाबाद रोडवरील उमाळा फाट्याजवळ ट्रक (क्र.एम.एच. 46 ए.एफ. 5554) ची तपासणी केली असता त्यात निर्दयीपणे कोंबून विनापरवाना 11 बैल कत्तलीसाठी नेत असल्याचे आढळल्यानंतर तीन लाख 30 हजार रूपये किंमतीच्या 11 बैलांची सुटका करण्यात आली तर एक लाख रूपये किंमतीचा ट्रक एमआयडीसी पोलीसांनी जप्त केला. या प्रकरणी ट्रक चालक आसिफ उस्मान समा (30, रा.मेहरूण) व ट्रक मालक तन्वीर शेख सुपडू (23, रा.मास्टर कॉलनी) यांना अटक करण्यात आली. या प्रकरणी समाधान पाटील (रा.कांचन नगर) यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, ही कारवाई सहाय्यक फौजदार आनंदसिंग पाटील, रवींद्र चौधरी, हवालदार जितेंद्र राजपूत, पोलीस नाईक गणेश शिरसाळे, कॉन्स्टेबल गोविंदा पाटील यांनी केली.