मुंबई : कर्जमाफीसाठी राज्यभरातून सुमारे 56 लाख 59 हजार शेतकर्यांनी अर्ज भरले होते. त्यापैकी 2 लाख 41 हजार शेतकर्यांकडे आधार क्रमांक नसल्याने त्या अर्जांची पुन्हा छाननी होणार आहे. कर्जमाफीसाठी मुंबई शहरातून 23 हजार 715 तर उपनगरांतून 1 हजार 620 शेतकर्यांनी कर्जमाफीचे अर्ज केले आहेत. तर अहमदनगर जिल्ह्यातून सर्वाधिक म्हणजे 3 लाख 34 हजार 920 शेतकर्यांनी कर्जमाफीचे अर्ज दिले आहेत.
दहा लाख बनावट शेतकरी
कर्जमाफीचे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 22 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. यापूर्वी ही मुदत 15 सप्टेंबरपर्यंत होती. कर्जमाफीचा लाभ घेऊ इच्छिणार्यांमध्ये 80 लाख पात्र, तर दहा लाख बनावट शेतकरी असल्याचा दावा, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. ऑक्टोबरअखेरपर्यंत कर्जमाफीची रक्कम शेतकर्यांच्या कर्ज खात्यावर जमा केली जाईल, असे आश्वासनही चंद्रकांत पाटील यांनी दिले होते. कर्जमाफीसाठी ऑनलाईन अर्ज करताना अजूनही काही शेतकर्यांना अडचणी येत आहेत. मात्र ज्यांची बँक अकाऊंट बोगस आहेत, अशा शेतकर्यांनाच या अडचणी येत असल्याचेही पाटील म्हणाले होते.