कर्जाला कंटाळून फुपनगरीत शेतकर्‍याची आत्महत्या

जळगाव तालुका पोलीस ठाण्यात नोंद : शेतकरी आत्महत्येच्या घटनांमध्ये वाढ

जळगाव : तालुक्यातील फुपनगरी येथे शरद रामदास वाणी (39) या तरुण शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवार, 10 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली. कर्जबाजारीपणामुळे वाणी यांनी आत्महत्या केल्याचे सांगितले जात आहे. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

घरी एकटेच असताना आत्महत्या
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, फुफनगरी येथे शरद रामदास वाणी कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांची पत्नी शोभा या दोन्ही मुलींसह माहेरी गेल्या होत्या. बुधवारी ते घरी एकटेच होते. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शरद वाणी यांनी राहत्या घरात गळफास घेतल्याचे शेजारच्यांच्या लक्षात आले. त्यांनी जळगाव शहरात वास्तव्यास असलेले शरद वाणी यांचे मोठे बंधू रवींद्र यांना माहिती कळविली. तसेच शरद यांना तातडीने जिल्हा रुग्णालयात हलविले. येथील वैद्यकीय अधिकार्यांनी त्यांना मृत घोषीत केले. शरद वाणी ीयांच्याकडे दोन एकर शेती आहे. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळामुळे नुकसान होवून शेतातून फारसे उत्पन्न आले नाही. त्यामुळे विविध कार्यकारी सोसायटी तसेच इतर कर्जाची फेड कशी करायची यामुळे ते नैराश्यात होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्या केल्याची माहिती वाणी यांचे भाऊ रवींद्र वाणी यांनी दिली. मयत शरद वाणी यांच्या पश्चात पत्नी, दोन वर्षाची व एक तीन महिन्याची अशा दोन मुली व भाऊ असा परिवार आहे. याप्रकरणी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.